- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-अवकाळी पावसाने देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या धान पिकाला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे.याचा सर्वाधिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.अनेकांनी कापलेले धान सुकवण्यासाठी शेतात ठेवले होते,काही ठिकाणी कापणीचे काम सुरू होते; मात्र,अचानक झालेल्या मुसळधार पावसाने हे सर्व धान भिजून गेले.शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान आता मातीमोल होत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे,दिवाळी संपताच शेतकऱ्यांनी हलक्या धानकापणीला सुरुवात केली होती.शेतकऱ्यांनी दिवाळी कशीबशी साजरी केली आणि लगेच धानकापणी करून आलेला धान बाजारपेठेत विकून उधार,उसनवारी फेडण्याच्या तयारीत असतांनाच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.देसाईगंज तालुक्यातील धानपिकावर खोडकिडा,करपा,मावा तुडतुडा या कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यातून शेतकरी कसाबसा सावरला असतांनाच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी; यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशीही मागणी मनोज ढोरे यांनी केली आहे.
- Advertisement -

