उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.दुपारच्या दरम्यान उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे.एकीकडे आरोग्य विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे.वाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.भंडारा जिल्ह्याच्या तापमानात सतत वाढ होत आहे.जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून जिल्ह्यात आज ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत.तसेच नागरिकांना घराबाहेर पडू नये; असा सल्ला दिला जात आहे.
त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.भास्कर तरारे वय ५१ वर्षे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सदर व्यक्ती भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे वास्तव्यास होता.उन्हाचा त्रास जाणवू लागल्याने भास्कर तरारे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान भास्कर यांचा मृत्यू झाला.उष्माघाताचा पहिला बळी भंडारा जिल्ह्यात गेला असून आणखी पाच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपचार घेण्यासाठी दाखल आहेत.

