उद्रेक न्युज वृत्त
पुणे :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकांचे सोमवारी दिनांक- ३ जून रोजी वाटप करण्यात येणार आहे.२१ मे रोजी बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला होता.विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या गुणपत्रिका,स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवारी दिनांक- ३ जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे व स्थलांतर प्रमाणपत्रांचे वाटप करायचे आहे.त्यानुसार विभागीय मंडळस्तरावर नियोजन करावे; असे स्पष्ट करण्यात आले आहे.

