उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गांधीनगर) :- आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय सामाजिक संशोधन पद्धती या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सुभाष उपाते,मुख्य मार्गदर्शक डॉ. डी टी गजभिये,समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विठ्ठल चव्हाण व विद्यार्थी परिषदेचे सचिव चंदन वीरघरे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविकेतून बोलताना डॉ.विठ्ठल चव्हाण म्हणाले की,अलीकडे संशोधनाला फार महत्त्व प्राप्त झाले असून नवनवीन संशोधनामुळे समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.त्यातून मानवी समाजाचा विकास होत आहे.डॉ.डी.टी.गजभिये म्हणाले, सामाजिक संशोधनाची पद्धत अतिशय सोपी असून त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवड असणे फार आवश्यक असते.कारण कोणत्याही समाजाचा संशोधन करण्यासाठी संशोधनकर्त्या व्यक्तीला प्रत्यक्षपणे संशोधन कार्यात सहभागी होऊन खरी माहिती सर्व समाजासमोर मांडावी लागत असते.यासाठी प्रामुख्याने शास्त्रा चे दोन प्रकार पडतात.एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरा सामाजिक शास्त्र हे दोन शास्त्रे वेगवेगळी असली तरी संशोधन करण्याची पद्धत मात्र सारखी आहे.कोणतेही शास्त्राचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी प्रस्तावनेपासून तर संशोधन अहवाल,निष्कर्ष, शिफारसी व संदर्भ ग्रंथ सूची ची मांडणी व्यवस्थितपणे होणे आवश्यक असते. तेव्हाच खऱ्या अर्थाने संशोधनाला महत्त्व प्राप्त होते.असे मौलिक विचार मांडले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.सुभाष उपाते म्हणाले की, संशोधनाची प्रयोगशाळा हा संपूर्ण समाज आहे.या समाजातील वेगवेगळ्या समस्यांचे अध्ययन करून त्यावर उपाय योजना करणे आवश्यक असते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तळागाळातील दुर्बल समाजाच्या समस्याचे सखोल अध्ययन करून समाजासमोर आणावे व उपाययोजना सुचवाव्या त्यातून मागासलेला समाज पुढे येईल.असे मौलिक विचार व्यक्त केले.सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. सेजल इंदुरकर व आभार अखिलेश सहारे यांनी मांडले.या कार्यशाळेत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

