उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- मागील आठवड्यात वरोरा च्या आनंदवनातील एका तरुणीच्या निघृण हत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केली होती.या प्रकरणी पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांची काल,मंगळवारी दि.२ जुलै ला चंद्रपूर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. काचोरे यांच्या जागी मुंबईतील अजिंक्य तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली; अशी माहिती पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.
या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.याप्रकरणी पोलिस हवालदार धनंजय वरगंटीवार,महिला पोलिस हवालदार मनीषा कुत्तरमारे व पोलिस शिपाई नितीन तुराळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवनात आरती चंद्रवंशी या तरुणीची प्रेमप्रकरणातून हत्या करणारा आरोपी समाधान माळीने बुटाच्या लेसने वरोरा पोलिस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.ही घटना रविवारी दि.३० उघडकीस आली.समाधानला ७ दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्याच्यावर देखरेख ठेवण्याची जवाबदारी निलंबित कर्मचाऱ्यांवर होती. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये समाधान जोड्यांची लेस काढतांना दिसतो आहे. त्याची नोंद या तिघांनी घेतली नाही आणि अनर्थ घडला.त्या ३ कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले.पुढील चौकशी करून अहवाल येतपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे.पोलिस अमोल काचोरे कोठडीत आरोपीचा मृत्यू ही गंभीरबाब असल्याने काचोरे यांची बदली केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

