उद्रेक न्युज वृत्त
राजुरा(चंद्रपूर):-शेतकऱ्याच्या जमिनीचे बनावट कागदपत्र सादर करून सरपंच आणि आदिवासी कार्यकारी संस्थेच्या व्यवस्थापकानेच १ लाख ८ हजार ५८७ रूपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार काल,शुक्रवारी सोंडो येथे उघडकीस आला.न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.मात्र आरोपी फरार झाले आहेत.सरंपच जयपाल आत्राम, शाखा व्यवस्थापक जगन दुर्गे अशी आरोपींची नावे आहेत.दरम्यान,पीडित शेतकरी विठ्ठल मेश्राम यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
शेतकरी विठ्ठल मेश्राम यांची १० एकर शेती आहे. सरपंच जयपाल आत्राम देवाडा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे शाखा व्यवस्थापक जगन दुर्गे यांनी शेतकरी मेश्राम यांची सहमती न घेता मधुकर मेश्राम तसेच प्रभाकर मेश्राम यांच्या नावाने एकूण एक लाख ८ हजार ५८७ रूपयांचे कर्ज घेतले. दरम्यान,मधुकर मेश्राम व प्रभाकर मेश्राम या दोघांचाही मृत्यू झाला.मात्र सातबाऱ्यावर मालकी हक्क विठ्ठल मेश्राम यांची असल्याने मृतकांच्या नावाच्या कर्जाचा भरणा करण्यासाठी सोसायटीने नोटीस बजावली.त्यानंतर मेश्राम यांनी कोर्टात धाव घेतली.

