- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यात कारमधील एका कुटुंबातील चार सदस्य,ट्रकचा चालक आणि क्लीनर या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.सदरची घटना आज सोमवारच्या सकाळी उघडकीस आली. अपघातात कार चालक अंकुश राऊत,राजेश आनंदराव टिपले,सुषमा राजेश टिपले,जान्हवी राजेश टिपले,सर्व रा.सालोड,ता.जि.वर्धा यांचा मृत्यू झाला. तसेच आयशर ट्रक चालक संजय कुमार,रा. धनाजीपूर,उत्तर प्रदेश आणि ट्रक क्लीनर समरजित पाल,रा.गडहरियनपूर,उत्तर प्रदेश यांचाही मृत्यू झाला.
टिपले कुटुंब आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात सोडून एमएच ३२ वाय १४३९ क्रमांकाच्या कारने पुण्यावरून समृद्धी महामार्गाने मध्यरात्री परत येत होते.दरम्यान,विरुळ जवळ समृद्धी महामार्गावर तत्पूर्वीच नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर इथेनॉलचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.त्यामुळे वाहने दुसऱ्या लेनवर टप्प्याटप्प्याने सोडली जात होती.या दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार ट्रकखाली चिरडली गेली आणि क्षणातच ट्रकला आग लागली.या आगीत ट्रक चालक आणि क्लीनर यांचा होरपळून मृत्यू झाला,तर कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.महामार्ग पोलीस अधिकारी सरिता यादव, पुलगावचे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.आग आटोक्यात आणल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली.या भीषण अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

