- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८ सप्टेंबर रोजी देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वार्ड येथे विद्यार्थ्यांना “मोबाईल व्यसनातून मुक्ती” या विषयावर विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवेक कहाळे,जिल्हा संघटक (स्काऊट)तर प्रमुख अतिथी म्हणून साधना भुरसे, मुख्याध्यापिका,जि.प.उच्च प्राथमिक शाळा,डोंगरगाव (ह.)उपस्थित होत्या.
यावेळी मोबाईलचे व्यसन कसे लागते,त्याची सुरुवात कशी होते आणि हळूहळू त्याचे रूपांतर व्यसनात कसे होते,याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्यात आले.मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यासातील एकाग्रता कमी होणे,वेळेचा अपव्यय, झोपेच्या सवयींवर परिणाम,डोळ्यांवर ताण,शारीरिक हालचाली कमी होणे तसेच सामाजिक संवादावर होणारे परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक विवेक कहाळे यांनी मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करण्यापेक्षा मोबाईलचा योग्य,मर्यादित आणि गरजेपुरता वापर कसा करावा,यावर विशेष भर दिला.मोबाईल वापरासाठी वेळेचे नियोजन करणे, अनावश्यक गेम्स व सोशल मीडिया टाळणे, अभ्यास व वाचनासाठी निश्चित वेळ देणे,मैदानी खेळ,छंद,कला, वाचन आणि प्रत्यक्ष मित्र-परिवाराशी संवाद वाढविणे यांसारखे प्रभावी उपाय त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. “मोबाईल आपल्या हातातील साधन आहे; तो आपल्या जीवनाचा मालक होऊ नये,” असा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईल वापराचे आत्मपरीक्षण करावे आणि ‘मोबाईल कमी,वाचन व मैदानी खेळ अधिक’ असा संकल्प करावा,असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा जीवनोपयोगी उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.शाळा केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञान देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी,योग्य जीवनशैली आणि जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार देणारे केंद्र असले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या अतिवापराबाबत जागरूकता निर्माण झाली असून, “डिजिटल साधनांचा वापर करा; पण त्याचे व्यसन होऊ देऊ नका” हा सकारात्मक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले.
- Advertisement -

