- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.या अभ्यासिकेचे लोकार्पण मंगळवारी जिल्हाधिकारी पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.या लोकार्पण सोहळ्यानिमित्त गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे ग्रामस्थ व युवकांना शुभेच्छा देत लोकसहभागातून उभारलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
यावेळी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान,आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी,गटविकास अधिकारी मंगेश आरेवार,नायब तहसीलदार दोनाडकर, सहायक गटविकास अधिकारी कुर्झेकर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
- लोकसहभागाचा उपक्रम इतर गावांसाठीही आदर्श– ॲड.आशिष जयस्वाल
पळसगावसारख्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका सुरू करण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे.जिल्ह्याचा सहपालकमंत्री म्हणून या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांचे मनापासून कौतुक व अभिनंदन करतो,असे ॲड.आशिष जयस्वाल यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितले.
ही अभ्यासिका जिल्ह्यातील युवकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाची ठरेल.लोकसहभागातून उभारलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी असून त्यापासून प्रेरणा घेऊन अन्य गावांमध्येही अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम उभे राहतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पळसगावच्या ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून इतरांसमोर चांगले उदाहरण निर्माण केल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
- विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा– जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी पंडा यांनी अभ्यासिकेची पाहणी करून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अभ्यासाची सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या अशा शैक्षणिक सुविधा गावाच्या विकासाला चालना देतात आणि अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरतात,असे त्यांनी सांगितले.
अभ्यासिका ही केवळ अभ्यासासाठी जागा नसून विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यासाची सवय,शिस्त आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणारे केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून स्पर्धा परीक्षा,उच्च शिक्षण तसेच विविध क्षेत्रांतील करिअरसाठी स्वतःला सक्षम करावे,असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे.त्यांना योग्य शैक्षणिक वातावरण,मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात.जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या विकास व रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांनी शिक्षणासोबत कौशल्यविकासावरही भर द्यावा,असे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.
अभ्यासिकेच्या वीज खर्चात बचत होण्यासोबत विद्यार्थ्यांना नियमित वीज सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सौरऊर्जा यंत्रणा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
लोकसहभागातून निर्माण झालेल्या या अभ्यासिकेची स्वच्छता,देखभाल आणि योग्य व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे पार पाडावी.उपलब्ध सुविधांचे जतन करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल,यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहनही त्यांनी केले.
‘जनकल्याणम्’ अभ्यासिकेमुळे पळसगाव व परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा,उच्च शिक्षण आणि करिअरच्या तयारीसाठी गावातच अभ्यासाचे अनुकूल वातावरण उपलब्ध झाले आहे.

- Advertisement -

