- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा देणाऱ्या ‘ज्ञानमित्र’ या अभिनव उपक्रमाला विशेष महत्त्व देण्यात आले.तसेच ‘एक तास वाचनाचा’ या उपक्रमाचीही सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमाकांत कवासे होते.तर शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
- ‘ज्ञानमित्र’ विद्यार्थीच विद्यार्थ्यांचे शिक्षक👇
शाळेतील ‘ज्ञानमित्र’ हा उपक्रम म्हणजे “विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्याला शिकविणे आणि परस्पर सहकार्याने प्रगती साधणे”या संकल्पनेवर आधारित अभिनव शैक्षणिक उपक्रम आहे.या उपक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात अधिक सरावाची आवश्यकता आहे,अशा ज्ञानार्थी विद्यार्थ्यांना प्रगत विद्यार्थ्यांच्या ‘ज्ञानमित्र’ जोड्या देण्यात आल्या आहेत. ज्ञानमित्र आपल्या मित्राला समजून घेऊन,त्याच्या अडचणी दूर करून आणि नियमित सराव करून घेत त्याच्या अध्ययनात प्रगती घडवून आणणार आहेत.
“मला जे येते,ते माझ्या मित्राला शिकवतो; माझ्या मित्राची प्रगती म्हणजे माझीही प्रगती” या भावनेतून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य,नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,ज्ञान वाटल्याने कमी होत नाही,उलट ते अधिक समृद्ध होते.त्यामुळे प्रत्येक सक्षम विद्यार्थ्याने आपल्या एका मित्राच्या अध्ययनाची जबाबदारी स्वीकारून त्याला पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.या उपक्रमाची मध्यावधी चाचणी येत्या,सोमवार ७ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
- ‘एक तास वाचनाचा’ पुस्तकांशी मैत्री करण्याचा संकल्प👇
विद्यार्थ्यांमध्ये नियमित वाचनाची सवय निर्माण व्हावी, मोबाईल व दूरदर्शनपासून काही काळ दूर राहून पुस्तकांशी नाते जोडावे,यासाठी ‘एक तास वाचनाचा’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
“दररोज एक तास वाचन-ज्ञान,विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली” हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
- स्वयंशासन दिनातून नेतृत्वाचा अनुभव👇
स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षकांची भूमिका पार पाडत विविध वर्गांमध्ये अध्यापन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण,संवादकौशल्य,शिस्त,वेळेचे नियोजन व जबाबदारीची जाणीव विकसित झाली.
- शिक्षक दिन उत्साहात👇
भारताचे माजी राष्ट्रपती,महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यात आले.शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा शिल्पकार आहे,हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.यावेळी रामेश्वर कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.कार्यक्रमास रामलाल बगमारे,प्रदीप ठाकरे,पल्लवी बगमारे,रागिणी मिसार,अस्मिता मेश्राम,मंगेश तुपट, तृषाली सुखदेवे,अपर्णा जडे,प्राची खरकाटे व भारती राऊत यांच्यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिक्षक ईश्वर गहाणे यांनी केले,तर आभार मंगेश तुपट यांनी मानले.
- ‘ज्ञानमित्र’मधून नव्या शिक्षण संस्कृतीचा संकल्प👇
शिक्षक शिकवतात,विद्यार्थी शिकतात; पण ‘ज्ञानमित्र’मध्ये विद्यार्थीच विद्यार्थ्याला शिकवतो!
यातून केवळ शैक्षणिक प्रगती नव्हे,तर सहकार्य, नेतृत्व,आत्मविश्वास आणि “एकमेकांना पुढे नेण्याची” संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेने केला आहे.
“शिकूया… शिकवूया… एकमेकांना पुढे नेऊया!” या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.
- Advertisement -

