- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातच नाही तर सगळीकडेच संततधार पाऊस सुरू असल्याने नदी,नाले दुथडी भरून वाहू लागलेत.अश्यातच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडल्याने आज,मंगळवार ८ जुलै रोजी गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ पैकी ३३ दरवाजे १.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून ११ हजार ११७.६६ क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सतत तीन दिवस धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे.पूरसदृश स्थितीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील १५ रस्ते बंद झाले असून तुमसर ते बालाघाट आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान,कारधा पुल (जुना) येथे वैनगंगा नदीची इशारा पातळी ही २४५ मीटर आणि धोका पातळी २४५.५६ मीटर आहे.आज मंगळवारी सकाळी ८ वाजता वैनगंगा नदीच्या पाणी पातळीने इशारा पातळी गाठली असून तसेच धापेवाडा धरणाचे विसर्ग पाहता धोका पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.भंडारा जिल्ह्यातील सातही मंडळात एकूण ३८ गावात अतिवृष्टी झाली असून तुमसर तालुक्यातील सिहोरात २३१.५० मीमी सर्वाधिक पाऊस पडला आहे.तर नैसर्गिक आपत्तीने जिल्ह्यातील ७२ घरांचे अंशतः तर दोन घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे.सद्यःस्थितीत भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुराचे पाणी व इतर साथीचे रोग बळावण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
- Advertisement -

