- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले परतवून लावण्यासाठी आणि मजुरांचा जीव वाचवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एक अत्यंत भन्नाट युक्ती शोधून काढली आहे.वाघांना भुलविण्यासाठी वनविभागाने चेहऱ्यामागे चेहरा अर्थात मानवी मुखवटा लावण्याचा प्रयोग सुरू केला आहे.विशेष म्हणजे,पश्चिम बंगालमधील सुंदरबनच्या जंगलात मध गोळा करणारे लोक वाघांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात. तीच सुंदरबनची कल्पना आता भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात राबवली जात आहे.प्रामुख्याने मोहफुले वेचतांना आणि तेंदूपाने तोडतांना मजूर वाकून काम करतात,ज्यामुळे ते वाघासाठी सहज शिकार ठरतात.यासाठी मुखवट्याचा प्रयोग सुरू करण्यात आल्याने आता वाघही पूर्णपणे गोंधळात पडणार आहेत आणि समोरच्यावर हल्ला करायचा की नाही?असा पेचप्रसंग त्यांच्यासमोर निर्माण होणार आहे.
साकोली तालुक्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याने खळबळ उडाली होती.यावर उपाय शोधतांना जिल्ह्यातील पवनी मॉडेल आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.पवनी वनपरिक्षेत्रात दोन वर्षांपूर्वी सर्वप्रथम नागरिकांना मुखवटे वाटप करण्यात आले होते.वाघ हा नेहमी दबा धरून मागून हल्ला करतो ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.माणसाच्या डोक्याच्या मागील बाजूस मानवी मुखवटा लावल्यामुळे वाघाला दोन्ही बाजूंनी माणूस आपल्याकडेच पाहत असल्याचा भास होतो.यामुळे वाघ आपली शिकारीची संधी गमावल्याचे समजून हल्ला टाळतो.या कल्पक प्रयोगामुळे पवनी परिसरात गत दोन वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
सध्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम जोरात सुरू असून हजारो मजूर पहाटेपासून जंगलात जात आहेत. तेंदूपत्ता तोडणाऱ्या या मजुरांचा हिंस्त्र वन्य प्राण्यांपासून बचाव करण्याकरिता सहाय्यक वनसंरक्षक साकोली संजय मेंढे व लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी जंगलात जाणाऱ्या मजुरांना प्लास्टिकचे मानवी मुखवटे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.नुकतेच वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांच्या नेतृत्वात जांभळी सडक सहवन क्षेत्रातील बरडकिन्ही बिटात मजुरांना हे मुखवटे देण्यात आले.यावेळी जांभळीचे क्षेत्रसहाय्यक आर.जी. मेश्राम,बरडकिन्हीचे बीटरक्षक सुधीर कुंभरे व शीघ्र कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.
- Advertisement -

