उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- १८ वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी दुचाकी चालवितांना आढळून आल्यास त्याला २५ हजार रूपयांचा दंड व वयाची २५ वर्ष होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना देऊ नये; असे आदेश परिवहन आयुक्तांनी वर्षभरापूर्वी काढले होते. वय कमी असतांना दुचाकी चालवितांना वाहतूक पोलिसांनी पकडल्यास मोठी अडचण होणार असल्याचे सदर आदेशात म्हटले आहे.मात्र सध्या स्थितीत ओठांवर मिसरूड फुटण्याच्या आधीच म्हणजेच १८ वर्षाखालील मुलांना गाडी चालवण्यासाठी देणाऱ्या पालकांवरच सर्वप्रथम फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व आदेशा व्यतिरिक्त दुप्पट दंड आकारण्यात यावा; अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी म्हटले आहे.
सध्याच्या घडीला शहरातील व ग्रामीण भागातील अनेक रस्ते गुळगुळीत असल्याने सर्वात जास्त अल्पवयीन मुले ओठांवर मिसरूड फुटण्याच्या अवस्थेतच शहरातील व ग्रामीण भागातील गल्लीबोळातून रस्त्यांवरून सुसाट वेगाने वाहने चालवित असल्याने जणूकाही नागरिकांच्या जीवावर उठले की काय? अशी अवस्था सगळीकडे निर्माण झाली आहे.मुलांना सायकल आणि बसचा प्रवास करण्या ऐवजी पालक वर्ग वाहन चालविण्यास देऊ लागले आहेत.वयाच्या १८ वर्षांपूर्वीच मुलांच्या हातात एक्सलेटर आणि गिअर देऊ लागल्याने सर्वस्वी जबाबदार पालक वर्गच आहे.कमी वयाची मुले-मुली सुसाट वेगाने वाहन चालवतात.परंतु,त्यांच्यावर कारवाई होतांना दिसत नाही.अनेकवेळा सैराट होऊन सुसाट वेगाने दुचाकी पळविणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत.परिणामी,किरकोळ अपघात नेहमीच घडतात; याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.अशातच मुला- मुलींची वय कमी असतांनाही पालक वर्ग आपल्या पाल्यांना दुचाकी वा इतर वाहने चालविण्यास देत असल्याने पालक वर्ग तितकेच जबाबदार असल्याचे दिसून येतात.त्यामुळे कमी वयाची मुले असतांनाही वाहन चालविण्यासाठी देणाऱ्या पालक वर्गांवर ५० हजाराचा दंड आकारून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा; अशीही मागणी क्षितिज उके यांनी केली आहे.

