- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महागाईचे संकट असो वा स्वस्ताईतील पुरण पोळी,प्रत्येकांनाच वाटतेय की आपले छोटेसे घर असावे.मग,शासनाच्या अनुदानातून असो की स्वतःच्या खिशातील पैस्यातून बांधकाम केलेले असो. सहसा गोर-गरीब वा सर्वसामान्य नागरिक सर्वप्रथम शासन स्तरावरून मिळणाऱ्या घरकुलाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतांना दिसून येतात.त्यामुळे,याच संधीचा फायदा घेण्याचे काम काही ठगबाजांच्या टोळीने चालवला असल्याचा धक्कादायक प्रकार देसाईगंज तालुक्यात उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे,एक व्यक्ती दुचाकीवरून सुटा-बुटात गावात पोचतो.स्वतःला पंचायत समितीच्या बांधकाम विभागातून आल्याचे सांगतो. त्यानंतर,विश्वास बसावा म्हणून पंचायत समितीतील काही कर्मचाऱ्यांचे नावही घेतो व तुम्हाला घरकुल मंजूर झाल्याचे सांगून पैशांची मागणी करत असल्याने नागरिकांनी अशा ठगांपासून सावध राहावे आणि गावात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन सुजाण नागरिकांकडून करण्यात आले आहे.
देसाईगंज तालुका मुख्यालयापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड गावात काल शुक्रवारी असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.कुरुड येथील ब्रम्हदास बाबुराव पारधी वय ४५ वर्षे हे दुपारच्या सुमारास घरी असतांना एक अनोळखी व्यक्ती सुटा-बुटात दुचाकीवरून खाली उतरला आणि त्याने देसाईगंज पंचायत समिती येथून आल्याचे सांगितले.त्यानंतर, “तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे; येत्या दोन दिवसांत तुमच्या खात्यावर पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये जमा होणार आहेत; यासाठी मला ५ हजार रुपये द्या” असे ब्रम्हदास पारधी यांना म्हटले. पारधी यांनी “आज माझ्याकडे पैसे नाहीत; मी २६ तारखेला पैसे देतो,” असे सांगितल्यानंतर “ठीक आहे मी सोमवरला येतो”,असे म्हणून तो ठगबाज तिथून पसार झाला.१५ दिवसांपूर्वी शिवराजपुर येथील महादेव बेदरे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.माहितीनुसार,सदरचा प्रकार हा आत्ताचाच नाही,तर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून देसाईगंज तालुक्यात सुरू असल्याने देसाईगंज पंचायत समितीच्या बांधकाम विभागाची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः घरकुलाचा लाभ हा कोणत्याही व्यक्तीकडून दिला जात नसून शासन स्तरावरून दिला जातो.सर्वप्रथम गावातील ग्रामपंचायतीत घरकुलासाठी अर्ज करावा लागतो.त्यानंतर,चौकशी करून अर्ज मंजुरीसाठी पंचायत विभागाला पाठवला जातो.पंचायत विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे दस्तऐवज पाठवते. त्यानंतर,परत तीच क्रिया पार पाडली जाते व नंतर शेवटी घरकुल मंजुरीची यादी ग्रामपंचायतीला येत असते. त्यामुळे,कोणताही व्यक्ती घरकुलास मंजूरी देत नसतो. त्यामुळे,एखादा अनोळखी व्यक्ती येऊन घरकुलाच्या नावाने पैशांची मागणी करत असेल,तर अश्या ठगबाजांपासून सावधगिरी बाळगा व तात्काळ एका सुजाण नागरिकांस कळवा किंवा संबंधित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घ्या.आज देसाईगंज तालुक्यात घडले,उद्या कोणत्याही तालुक्यात असे प्रकार घडू शकतात.त्यामुळे सतर्कता बाळगा.
- Advertisement -

