- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम कामगारांकडून पैशांची मागणी करून आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.या पार्श्वभूमीवर ‘न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशन’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर दरेकर,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मायासिंग बावरी आणि चिमूर तालुकाध्यक्ष कुलदीप कुळसंगे यांनी महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माहितीनुसार,बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणासाठी केवळ १ रुपया इतकेच शुल्क आकारले जाते.तसेच मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.या लाभासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क,कमिशन किंवा लाच देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोंदणी,नूतनीकरण आणि विविध योजनांची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून ती अधिकृत पद्धतीने केली जाते.त्यामुळे कोणतीही व्यक्ती,एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा कोणतीही संस्था योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे,कमिशन किंवा लाचेची मागणी करत असल्यास अशा व्यक्तींना कोणतेही पैसे देऊ नयेत,असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही व्यक्तीकडून योजनांच्या नावाखाली पैशांची मागणी होत असल्यास किंवा फसवणुकीचा प्रयत्न होत असल्यास संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(ACB)अथवा स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ लेखी तक्रार करावी,असेही या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर दरेकर,जिल्हाध्यक्ष मायासिंग बावरी आणि चिमूर तालुकाध्यक्ष कुलदीप कुळसंगे यांनी सांगितले की,शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ हा प्रत्येक पात्र बांधकाम कामगाराचा हक्क आहे.त्यामुळे कोणत्याही एजंट,दलाल किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये.शासनाच्या अधिकृत प्रक्रियेनेच अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा,तसेच आपल्या परिसरातील इतर बांधकाम कामगारांनाही याबाबत जागरूक करावे.
“शासनाच्या योजनांच्या नावाखाली कोणालाही पैसे किंवा कमिशन देऊ नका.लाचखोरी व फसवणुकीविरुद्ध आवाज उठवा आणि आपल्या हक्काच्या योजनांचा लाभ केवळ अधिकृत मार्गानेच घ्या,” असे आवाहन न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर दरेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मायासिंग बावरी,चिमूर तालुकाध्यक्ष कुलदीप कुळसंगे आणि न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -

