उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
संपादकीय :- एखादा व्यवसाय करतो म्हटला वा एखादे शासन स्तरावरून काम आणून बांधकाम करतो म्हटले तर त्यासाठी सर्वप्रथम अनेकांना मोठ्या प्रमाणावर पैस्याची गुंतवणूक ही करावीच लागते. गुंतवणूक केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. मात्र काही असेही कार्यकर्ते आहेत की,त्यांना ना गुंतवणूक करावी लागते; ना गुंतवणुकीवर खर्च करावा लागतो.अशा कार्यकर्त्यांना नुसता केवळ वारला घळघळ पैसा मिळत असल्याची प्रचिती पूर्वी व हल्ली निदर्शनास येऊ लागली आहे.अनेकांना प्रश्न पडला असेलच की,असे कार्यकर्ते कोण? असे कार्यकर्ते म्हणजे ‘शासकीय काम व पंधरा दिवस थांब’ म्हणविणारे विविध विभागांतील आमचे-तुमचे व सर्वांची कामे करण्यासाठी शासकीय कार्यालयांच्या छत्र-छायेत पंख्याची हवा खात बसणारे ‘लोकसेवक’. अशांना कुणाशी कसलेही देणे-घेणे नसते.त्यांना केवळ पैका मिळण्याची वाट असते.यामध्ये अनेकांची वेगवेगळी टक्केवारी ही ठरलेली असते.काहीजण टक्केवारी साठी नवनवीन फंडे वापरून कामांच्या फाईल टेबलावर ठेवतांना दिसून येत आहेत.ठरलेली टक्केवारी मिळाली नाही तर अमुक काम बरोबर नाही; तमुक काम चुकीचे आहे; अशी बतावणी करून आपलीच पोळी शेकण्याचा हल्ली ट्रेण्ड वाढलेला दिसून येतो.अशातच एखादा प्रकरण उघडकीस आल्यास त्यावर पडदा घालण्यास ‘लोकसेवक’ हे माहीर झालेले आहेत.वरिष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत ‘खेला हो बे’ सुरू झाला आहे.आपणाला नेहमी वाटते की,दोन नंबरी म्हणजे केवळ अवैध धंदेच आहेत.मात्र सध्या स्थितीत दोन नंबरी पेक्षाही दस नंबरी उच्चांक कुणी गाठला असेल तर जनतेच्या लोकसेवकांनी. टक्केवारी मिळाली की, ‘अपना काम बनता; कही भी जाये जनता’…असे हल्ली चित्र निर्माण झाले आहे. यावर कुठे तरी अंकुश घालणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिक रात्रंदिवस जिवाचे रान करून कितीही राबले; तरीही ‘पळसाला पाने ही तीनच’ अशी म्हण जरी असली तरीही सध्याच्या घडीला कुठल्या तरी पळसाला पाने चार आलेली दिसण्यामागचे मुख्य कारण म्हणजे यांना’ ना गुंतवणूक करावी लागते; ना खर्च करावा लागतो…..!केवळ ‘त्यांना’ वारला घळघळ पैसा…मिळतो.असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

