संपादकीय
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :- जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांची पिळवणूक करणे केव्हा थांबणार कुणास ठाऊक? जिवाचे रान करून, रात्रंदिवस मेहनत करून,शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवावर सर्वच जण उठले की काय?एकीकडे लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी; अशी अवस्था असतांनाही कृत्रिमरीत्या येणारे महापूर,हिंस्त्र व जंगली प्राण्यांमुळे पिकांची होणारी नासधूस,कधी अवकाळी पाऊस तर कधी किडीचा प्रादुर्भाव,सततची नापिकी,बँकांच्या कर्जाचे ओझे तसेच इतर कारणांमुळे शेतकरी हवालदिल होऊन; चिंताग्रस्त होऊन आत्महत्या करण्यास धजावित असतात.मात्र याचे कुणाला कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते.अशातही शेतकरी बांधवांचे धान निघाले की,आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभाव केंद्रावर अभिकर्ता संस्थांकडून धानाची खरेदी केली जाते.येथे अभिकर्ता संस्थांनीच शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यासाठी मजुरांचा खर्च अदा करणे आवश्यक आहे.परंतु हा खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो. यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.हमालीच्या नावावर शेतकऱ्यांकडून ८ ते १० रुपये प्रतिकट्टा वसुली केली जाते.यावर्षी सुद्धा आर्थिक लुटीची पुनरावृत्ती होणार काय? असा सवाल शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.हमीभाव खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दरवर्षी हमालीची रक्कम वसूल केली जाते.नाईलाजास्तव शेतकरीसुद्धा मुकाट्याने हमाली देऊन आपले धान विक्री करतात.शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा अभिकर्ता संस्था घेतात.आर्थिक लुटीची ही परंपरा यावर्षी तरी थांबणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.अन्यथा ‘आम भरो पोट भारो अन् प्रत्येक वेळेस शेतकरी मरो’ असे केल्यास उपोषणाचा पावित्रा घेण्यात येणार असल्याचे शेतकरी पुत्रांनी म्हटले आहे.

