उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- ग्राहक रास्त भाव दुकानात गेले असता अनेक वेळा दुकान बंद असते.त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागते.शहरातील तसेच ग्रामीण भागातील रास्त भाव दुकानदारांचा दुकान उघडण्याचा खरा वेळ कोणता?कोणत्या कंट्रोलमध्ये किती रेशन कार्डधारक आहेत; मोफत रेशन खरंच लाभार्थ्यांना मिळते काय? असे अनेक प्रश्न रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांच्या मनात घर करून जातात.अशातच यावर शहरातील तसेच ग्रामीण भागातील गोर-गरीब त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासून शासन स्तरावरून दक्षता समिती गठीत करण्याच्या पूर्वीपासून सूचना आहेत.
रेशन दुकानातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्यातील अध्यक्ष,सचिव,सदस्य नामधारी असल्याने रेशन दुकानातील दक्षता समिती केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे.ग्राम पातळीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रेशन दुकानांतून वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्याकरिता अध्यक्ष, सचिव,सदस्य अशी मिळून १२ अशासकीय पद असलेली दक्षता समित्या स्थापन करण्यात येतात. अशासकीय समितीमध्ये गावातील अध्यक्ष सरपंच, तलाठी सचिव,सदस्यांमध्ये विविध कार्यकारी सोसायटी,तीन महिला,विरोधी पक्षाचे दोन सदस्य, अनुसूचित जाती प्रतिनिधी,अनुसूचित जमाती प्रतिनिधी व एक सामाजिक कार्यकर्ता इत्यादींचा समावेश आहे.या समितीचे कार्य शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त भाव दुकानांतून केला जातो किंवा नाही तपासणे,बनावट,खोट्या शिधापत्रिका व शिधापत्रिका न मिळालेल्या गरजू रहिवासी याबाबत आढावा घेणे, धान्य दुकानातून गैरप्रकारांना आळा घालणे,गावातील प्राप्त तक्रार नोंदवही तपासणे व इतर अशी अनेक कार्ये पार पाडली जातात.
या सर्वांचा कालावधी केवळ तीन वर्षांकरिता असतो.तीन वर्षे पूर्ण झाली की नव्याने ग्रामसभेद्वारे अशासकीय पदाधिकारी यांची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर प्रत्येक महिन्यातुन एकदा बैठक घेतली जाते.नियमित बैठका घेऊन बैठकीचा अहवाल तहसीलदार यांना पाठवावा लागतो. सर्व दक्षता समित्यांच्या बैठका वेळच्या-वेळी घेतल्या जातात किंवा नाही याची खातरजमा जिल्हास्तरावरील अप्पर जिल्हाधिकारी यांनी करणे आवश्यक आहे.मात्र दक्षता समितीतील अशासकीय पदाधिकारी एकही बैठक वा भेटी रास्त भाव दुकानदारांना देत नसल्याने त्यांची दुकान उघडण्याची व बंद करण्याची वेळ कोणती?कोणकोणत्या कंट्रोलमध्ये किती रेशन कार्डधारक आहेत?अंत्योदय,बीपीएल व एपीएलधारक किती? मोफत रेशन केव्हापासून आणि कधीपर्यंत येणार आहे; ते कोणाला मिळते आणि त्यामध्ये कोणते धान्य येते; त्याचे कशाप्रकारे वाटप केले जाते? धान्य दिल्यानंतर कार्डधारकांना पावती कशाप्रकारे दिली जाते? रेशनधारकांच्या घरातील सर्वाचे अंगठे स्कॅनने स्वीकार होतात काय? सर्वांना प्रत्येक महिन्यातील धान्य त्याच महिन्यात मिळते काय? जर एखाद्या कार्डधारकाने महिन्यात धान्य घेतले नाही तर त्या महिन्यातील त्यांचे धान्य त्याला दुसऱ्या महिन्यात मिळते काय? महिनाभरात केव्हाही राशनची उचल करता येते; असे परिपत्रक शासनाने अलीकडेच काढले आहे.तरीही काही राशन दुकाने बंदच असतात.यामुळे शिधापत्रिकाधारकांना आल्या पावलीच परत जावे लागते.यावर दक्षता समिती वा जिल्हा पुरवठा अधिकारी,तहसील कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांनी जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे.

