उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- शासनाकडून खरीप हंगामातील धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. परिणामी, अनेक शासकीय धान खरेदी केंद्रांवरील धान उघड्यावर पडून आहे. त्यातच सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात आलेले ४.२३ कोटी रुपये किमतीचे धान अवकाळी पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे. यापैकी जवळपास ६ क्विंटल धानाला अंकुर फुटले आहे.त्यामुळे केंद्र चालकाचे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यात धानाचे कोठार म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे.जिल्ह्यात खरीप व रबी (ऊन्हाळी) दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते.दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सीच्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते.तर राईस मिलर्सकडून या धानाची भरडाईसाठी उचल करून शासनाला तांदळाचा पुरवठा करण्यात येत असते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून राईस मिलर्सच्या मागण्या प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील राईस मिलर्सनी भरडाईसाठी धानाची उचल केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान पडून आहे.
विशेष म्हणजे, आदिवासी विकास महामंडळाच्या अनेक केंद्रांवर गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या केंद्रांवरील धान ताटपत्रीच्या आधारे उघड्यावरच पडून आहे. तर आता अवकाळी पावसामुळे हे धान भिजत असल्याने अनेक केंद्रांवरील धान कुजत आहे. दरम्यान, आदिवासी विकास महामंडळंतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रामार्फत सन २०२३-२४ या खरीप हंगामात परिसरातील पाच गावातील शेतकऱ्यांकडून ४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या १९ हजार ४१० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.मात्र,राईस मिलर्सकडून या धानाची उचल करण्यात आली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे हे धान भिजले असल्याने सडण्याच्या मार्गावर आहेत.तर यापैकी पावसात भिजल्याने जवळपास ६ हजार क्विंटल धानाला अंकुर फुटले आहे.त्यामुळे केंद्र चालकांना व शासनाला कोटी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

