उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील अनेक गावे समस्याग्रस्त आहेत.परंतु ग्रामपंचायतींचे पदाधिकारी गावातील समस्यांकडे लक्ष देत नसून केवळ ठेकेदारीत व्यस्त असल्याचे विदारक चित्र हल्ली सगळीकडेच दिसून येत आहे.अशातच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अशीच परिस्थिती असल्याने तालुक्यातील अनेक गावांत शिक्षण,घर, स्वच्छता,पिण्याचे पाणी,रस्ते,नाल्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.
गावचा सर्वांगीण विकास व्हावा; तसेच गावातील समस्या सोडविण्यात याव्या; हे केवळ प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या भरवशावर होऊ शकणार नसल्याने लोकशाही मार्गाने दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक घेऊन गावातील पदाधिकारी यांची ग्रामपंचायत स्तरावर निवड करण्यात येते. पदाधिकारी निवडून आल्यावर काही पदाधिकारी सोडल्यास इतर हुशार पदाधिकारी केवळ ठेकेदारी वा खिसे कसे गरम होणार; याकडे सर्वात जास्त लक्ष देण्यात मग्न असतात.
ग्रामपंचायतींचे पदाधिकारी ठेकेदारीत रमले असल्याने बांधकामांवर देखरेखीचा अभाव दिसून येत आहे. त्यातच नियोजनानुसार कामे केली जात नसून पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाची बांधकामे करण्यात येत आहेत.ग्रामपंचायतीचे पदाधिकारीच कंत्राटदार असल्यामुळे ‘हम करे सो कायदा’ अशी गत झाली आहे.बहुतांश गावांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांचे कंत्राट ग्रामपंचायत पदाधिकारी स्वतःच घेऊन; दुसऱ्यांची नावे पुढे करून; ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका बजावतांना दिसून येत आहेत.त्यामुळे अशांवर आळा घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

