- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रास तीन दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अशातच अनेक ठिकाणी उभी पिके आडवी झालीत तर काही ठिकाणी संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होऊन आर्थिक विवंचनेत सापडला आहे.सदरची बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या लक्षात येताच जिल्हा प्रशासनासह महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.त्याचप्रमाणे पंचनामे करतांना पारदर्शकता व गती राखण्याचेही निर्देश दिले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळू शकेल.
ऐन पिके गर्भात असतांनाच अवकाळीने झोडपले आहे.अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके हातची गेली आहेत.विशेषतः कर्ज घेऊन पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.या पावसामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे.या संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार मसराम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.त्यांनी धीर सोडू नये.आम्ही शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून योग्य त्या नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करत आहोत.पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण होऊन अहवाल शासनाला सादर केला जाईल.” गडचिरोलीसह विदर्भातील अनेक भागांमध्ये दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची मागणीही आमदार मसराम यांचेकडून होत आहे. त्यातच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिक विमा, जलसंधारण आणि शेतीसंबंधीच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.
- Advertisement -

