- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण भागात अवैध सट्टा-पट्टीचे जाळे पसरले आहेत.त्यातच, कुरखेडा शहरात दारूचा अवैध महापूर असूनही पोलीस विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करतांना दिसून येत असल्याने जिल्ह्यात अवैध धंदे जोमात असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहेत.विशेष म्हणजे,यापूर्वीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध धंद्यांवर लगाम घालून अनेकांना भूमिगत होण्यास भाग पाडले होते.मात्र,आताची परिस्थिती वेगळ्याच दिशेने भटकू लागल्याने यांस जबाबदार कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने सुगंधित तंबाखू,गुटखा आणि इतर प्रतिबंधित पदार्थाविरोधात धडक कारवाईचा सपाटा चालवला आहे.राज्यभरात छापेमारीचे सत्र सुरू असून या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.मात्र,देसाईगंज तालुक्यात अगदी उलट चित्र पाहायला मिळत असून,येथे सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री सुरू आहे.विविध किरकोळ विक्रेत्यांमार्फत त्याची विक्री केली जात आहे.या साखळीमुळे संपूर्ण परिसरात सुगंधित तंबाखू सहज उपलब्ध होत असून त्यावर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.या धोकादायक पदार्थांच्या विळख्यात सर्वाधिक अल्पवयीन मुले आणि तरुण अडकत असल्याने ही बाब चिंताजनक आहे. शाळकरी मुलेही या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
आरमोरी शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध सट्टा-पट्टीचा मालक एक,तर पट्टीचे आकडेमोड चिटोरे लिहिणारे अनेक उदयास आल्याने अनेकजण दोन आकड्यांच्या आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसू लागलेत.यामुळे दोन आकडे लावणारे कोमात गेल्याचे चित्र आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,आरमोरी शहरातून काही सट्टा-पट्टीचे आकडे निघत असल्याने शुभ अंकांची गोर-गरिबांना भुरळ घालून पैश्याची लुटमार सुरू झाली आहे.याचे जाळे देसाईगंज तसेच इतर तालुक्यात पसरल्याचीही चर्चा आहे.एवढा मोठा कारोभार सुरू असतांना अनेकांना विशेषतः पोलीस प्रशासनास याची साधी कल्पना नसणे म्हणजे दिसून न दिसण्यासारखे करणे होय. आता या सर्वांना दिसत नाही म्हणावे,पण ज्या ठिकाणी एसडीपीओ कार्यालय,या कार्यालयाच्या अखत्यारीत चार ते पाच पोलीस ठाणे,त्यातच पोलीस ठाण्याच्या आवारातच कार्यालय.अश्या कुरखेडा शहराच्या ठिकाणी खुलेआम एखाद्या बार प्रमाणे अवैध दारूचा महापूर वाहतोय,याला काय म्हणावे? कारवाई होते खरी,पण ती गावठी मोहाची दारू व देशीचे टिल्लू विकणाऱ्या काही विक्रेत्यांवर.यात थंडी बियर,विदेशी दारूचा पुरवठा करणारे बलाढ्य पुरवठाधारक तसेच विक्रेते यादीत समाविष्ट नसतात, हेही तितकेच खरे. पोलीस प्रशासनाने एखादी कमेटमेंट केली,तर कुणाची मजाल की तो अवैध धंदे करेल,पण चालत आहे ना..! चालू द्या..! तात्पुरती मलमपट्टी लावून काही काळातच ‘जैसे थे’ अवस्था होत असते.अशी अवस्था राहू नये, यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंदे बंद करून कठोर कारवाई करा,अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकत्यांकडून जोर धरू लागली आहे.
- Advertisement -

