उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या गिट्टीच्या ढिगावरून ट्रॅक्टर जाऊन नियंत्रण सुटल्याने ३२ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना काल,शनिवारी २९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.अविनाश शनिराम ठाकरे वय ३२ वर्षे रा.चोप,ता.देसाईगंज असे अपघातात ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
चोप गावातील रहिवासी असलेल्या अविनाश ठाकरे हे गावातील नीती आयोगाच्या अंतर्गत सुरू असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामावर जात असतांना मुख्य डांबरीकरण मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रक ला साईड देण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या मुख्य मार्गा लगत असलेल्या गीट्टीच्या ढीगाऱ्यावरून ट्रॅक्टर चालवीत असताना नियंत्रण सुटले.नियंत्रण सुटल्याने अविनाश सुरू असलेल्या ट्रॅक्टर खाली कोसळला त्यात समोरील चाक व मागील ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.याबाबत गावकऱ्यांना माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासन देण्यात आली.पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून मोका पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
महत्वाचे म्हणजे,चोप ते कोरेगावपर्यंत दीड किलोमीटर अंतराचे काम जानेवारी महिन्यात सुरू झाले.रस्त्याच्या कडेला गीट्टी व इतर साहित्य पडून असल्याने अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने चोप येथील पत्रकार गौरव नागपूरकर यांनी अनेकदा रस्त्याचे काम लवकरात-लवकर करण्यात यावे; याकरीता अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.मात्र,तक्रारींकडे दुर्लक्ष केल्या गेले. अशातच आता काल,मोठी दुर्घटना घडल्याने संबंधित कंत्राटदाराला कामात दिरंगाई केल्या प्रकरणी काळ्या यादीत टाकून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

