उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली):- गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच अवैध धंदे करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते.सुरुवातीला संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यात आले.मात्र हल्ली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधाण येऊन ‘गाव तिथे अवैध दारू अन् आता तुम्हीच सांगा साहेब किती पाव मारू…! असे विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी ही केवळ नावापुरतीच राहिली असल्याचे दिसून येत आहे.सन १९९३ पासून जिल्ह्यात दारू बंदी करण्यात आली.तेव्हापासून तर आजतागायत खरोखरच दारू बंदी झाली काय?जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कडक निर्णय जरी घेत असले तरीही त्याची अंमलबजावणी हल्ली होतांना दिसून येत नाही.सध्याच्या घडीला देसाईगंज तालुक्यात गाव तिथे अवैध दारू विक्रीचे धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावली आहेत.अशातच सर्व नजरे समोर दिसूनही न दिसण्यासारखे करणे म्हणजे स्वतः मुंग्या बनून साखर गिळण्यासारखे झाले आहे.तालुक्यातील कोकडी, शिवराजपुर,उसेगाव,किन्हाळा-मोहटोला,फरी-झरी,तुळशी,कुरुड, कोंढाळा,पोटगाव,विसोरा,शंकरपुर,एकलपुर,गांधीनगर,सावंगी, डोंगरगाव,पिंपळगाव,चोप,कोरेगाव व इतर गावांमध्ये अवैध दारू विक्री जोमात तर किती पाव मारू म्हणणारे कोमात असल्याचे दिसून येत आहेत.काही गावांमध्ये ४० ते ५० मीटर अंतरावरच अवैध दारूच्या दुकानांनी संसार थाटला असल्याचे दिसून येत आहे. कुठे देशी तर कुठे विदेशी अशातही स्वस्तात मस्त परवडणारी गावठी मोहफुलाच्या दारूचा महापूर देसाईगंज तालुक्यात ओसंडून वाहू लागला आहे. काहीजण दुजोरा देऊन म्हणतात की,तुम्ही धंदे करा; परंतु जरा जपून; अन्यथा कारवाईस पात्र; नाहीतर ‘तेरी भी चूप मेरी चूप’ असल्याची खमंग चर्चा हल्ली सर्वत्र सुरू आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कायदा,सुव्यवस्थेचा प्रश्न व काही अखत्यारीतील कलमान्वये अधिकारांचा वापर करून तत्कालीन अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदलीचे आदेश काढले असले तरीही पाहिजे त्या प्रमाणात अंमलबजावणीबाबत हल्ली निर्णय घेतला जातो काय? असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.

