- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे आज,शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक खेमराज एन.तिघरे यांनी भूषविले.तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मेश्राम,उमाकांत कवासे,अंगणवाडी सेविका निशा कांबळी,शिक्षक ईश्वर गहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी सोनाली मेश्राम हिने कुशलतेने केले,तर आभार प्रदर्शन हूचिका कांबळे हिने मानले.

अध्यक्षीय भाषणात तिघरे यांनी “शिक्षक कसा असावा” यावर प्रकाश टाकत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणादायी उदाहरणे दिली.तसेच शाळेतील गुणवंत शिक्षक-शिक्षिकांचा गौरव करण्यात आला.प्रसंगी शिक्षक मंगेश तुपट यांना उत्कृष्ट शिक्षक, अपर्णा जडे यांना उत्कृष्ट मीडिया प्रमुख तर तृषाली सुखदेवे यांना उत्कृष्ट खेळ निर्मितीसाठी योगदाना बद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या प्राची खरकाटे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते निशा कांबळी यांच्या वाढदिवसानिमित्त,त्यांचे सुपुत्र व शाळेचे माजी विद्यार्थी,सध्या राजस्थान येथे प्रशिक्षण घेत असलेले बीएसएफ जवान युवराज कांबळे यांनी शाळेला ६ हजार रुपये किंमतीचा डायस भेट दिला.त्यांच्या या योगदानाबद्दल शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेच्या उपक्रमांतर्गत १५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेला “दररोज एक तास वाचन” हा संकल्प उपक्रम आज,शुक्रवार ५ सप्टेंबरपासून प्रत्यक्षात राबविण्यात आला. संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत गावातील प्रत्येक मुलाने वाचन करावे,पालकांनी मोबाईल-टीव्ही बंद करून मुलांना सहकार्य द्यावे,यासाठी सर्व गावकरी व पालकांना आवाहन करण्यात आले.या उपक्रमाचा शुभारंभ शिक्षक दिनानिमित्त झाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता तिसरी,चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केले.शेवटी सर्व शिक्षकांचा फुले व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी सन्मान केला.विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या भाषणात उमाकांत कवासे यांनी शाळेचे मुख्याध्यापक तिघरे हे तन-मन-धनाने शाळेची सेवा करत असून,संपूर्ण शालेय टीम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केले.शेवटी निशा कांबळी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
- Advertisement -

