- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-राज्यातील महायुती सरकारने गावगाडा हाकणाऱ्या मिनी मंत्रालयातील सरपंचाची निवड ही ग्रामपंचायत सदस्यांमधून न करता गावातील जनतेंनी थेट निवडून द्यावे,असे फर्मान सोडल्याने काही सरपंच सोडता इतर सरपंच हे उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता आपल्याच मनमर्जिने कामे करून गावगाडा हाकण्याचा प्रयत्न करू पाहतात.मात्र, थेट निवड झाली असली तरीही त्यावर काही मर्यादाही असतात.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिहोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा रंजना तूरकर यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी पदमुक्त केले आहे.रंजना तूरकर या थेट सरपंचपदी निवडून आल्या होत्या.
सिहोरा ग्रामपंचायतीत ११ सदस्यांची बॉडी असून डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडली होती.त्यावेळेस रंजना तूरकर या थेट सरपंचपदी निवडून आल्या होत्या.त्यानुसार सन २०२३ मध्ये ग्रामपंचायतीतर्फे विविध विकास कामे करण्यात आली.विकास कामे करीत असतांना इतर सदस्यांना विश्वासात न घेता नियमांना बगल देण्यात आले.विशेष म्हणजे,१५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत साहित्य खरेदीत १ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु देयक अदा करतांना मासिक सभेत ठराव घेण्यात आला नाही.तसेच इतर नियम धाब्यावर बसविण्यात आल्याने सरपंच रंजना तूरकर यांच्या विरोधात उपसरपंच सलाम शेख,सदस्य महेश कामथे,प्रतीक घोडीचोर, चित्ररेखा सोनकुसरे,धनिका निनावे,वैशाली राऊत,लता दलाल,सविता नेवारे, कविता शरणागत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची दखल घेत चौकशी करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चौकशीत सरपंच आणि सचिव यांनी ८८ लाख २४ हजार ६२४ रुपयांचा निधी खर्च करतांना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले.प्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालावरून विभागीय आयुक्तांनी कारवाई करीत थेट सरपंचास पदमुक्त केले.
- Advertisement -

