उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-राज्यात स्वयंअर्थसहायित तसेच कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांची कॉन्व्हेंट संस्कृतीने भुरळ घातली आहे. मराठी माध्यमाच्या सरकारी व खासगी अनुदानित शाळेला विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.शाळेची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी नजीकच्या शाळेतील शिक्षकांमध्ये स्पर्धा वाढली आहे.जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत असून काही शाळांची विद्यार्थी गणपूर्ती झाली.तर अनेक शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत.कॉन्व्हेंट संस्कृतीपुढे मराठी शाळा टिकतील काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी संचमान्यतेनुसार शिक्षकांची संख्या ठरत असून विद्यार्थी कमी झाल्यास शिक्षकांना अतिरिक्त होतात.कुठल्याही शाळेत जाण्यापेक्षा आपल्याच शाळेत नोकरी टिकावी या अपेक्षेने अनेक शिक्षक विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात असतात.आजघडीला मराठी शाळा पेक्षा कॉन्व्हेंट संस्कृतीकडे पालक मोठ्या प्रमाणात वळत आहेत.यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत असल्याने पुढे मराठी शाळांचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा येऊन ठाकला आहे.
राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत २५ टक्के राखीव जागेवर पाल्याला प्रवेश मिळावा म्हणूनही पालकांची धडपड सुरू असते.त्यामुळे दिवसेंदिवस मराठी शाळातील विद्यार्थी संख्या रोडावत चालल्याने शाळांची संख्या घटत आहे.स्वयंअर्थसहायित शिक्षण संस्थांच्या टोलेजंग इमारती,वेगवेगळे गणवेश,सूटबूट आणि टायमधल्या कॉन्व्हेट संस्कृतीकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वळत आहेत.परिणामी ग्रामीण शाळांत विद्यार्थी संख्या रोडवली असून कशाबशा शाळा चालताहेत; हे वास्तव आहे.

