उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- आपणनेहमीच बघत असतो की,शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये विनापरवानगी पॉम्पलेट्स, स्टिकर,भित्तिपत्रके व पोस्टर्स लावली जातात.मात्र अशा विविध प्रकारच्या विनापरवानगी लावण्यात येणाऱ्या जाहिरातींवर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कारवाईचे प्रावधान करण्यात आले आहे.अनेकांना याची जाणीव नसल्याने आपल्याच मनमर्जिने जाहिरातींचे स्टिकर लावले जातात.असाच प्रकार शहरात विनापरवानगी भित्तिपत्रके लावणाऱ्या एक आशा व्यसनमुक्ती केंद्र आरमोरी आणि रिद्धी बिल्डर्स विरुद्ध मनपाने महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत तक्रार केल्याने रामनगर पोलिसांनी काल शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
वरोरा नाका,प्रियदर्शिनी चौक,जिल्हा परिषदेसमोरील परिसर,जटपुरा गेट तसेच डॉ.आलुरवार हॉस्पिटल परिसरात व्यसनमुक्ती केंद्राची तसेच फ्लॅटची जाहिरात करणारी रिद्धी बिल्डर्सची माहिती असलेली पॉम्पलेट्स व स्टिकर मनपाकडून पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार यांना १३ डिसेंबर रोजी पाहणीदरम्यान आढळून आले.
संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले.मात्र,भित्तिपत्रके न काढल्याने एक आशा व्यसनमुक्ती केंद्र व रिद्धी बिल्डर्स यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा दाखल झाला.बॅनरबाजीमुळे भित्तिपत्रके,पोस्टर्स,शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते, किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखून दिलेल्या सूचनांनुसार कारवाई करण्यात येते.त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स,बॅनर्स,होर्डिंग्ज,कापडी फलक लावणाऱ्यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

