उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.अशातच दिवसा आणि रात्रीही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढू लागल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.केवळ शहरातच नाही तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना हाच अनुभव येत आहे.मात्र हा प्रकार म्हणजे लोडशेडिंग नसून ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेहून अधिक मागणी झाल्यावर वीजपुरवठा ट्रीप होत असल्याने वीज खंडित होत असल्याचे महावितरणच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणामुळे उन्हाच्या झळा तीव्रतेने जाणवत आहेत.उकाड्यामुळे बहुतांश ऑफिस व घरांमध्ये एसी,कूलर आणि पंख्यांचा वापर वाढला आहे.वीज वापराचे प्रमाण बरेच वाढल्याने ट्रान्सफॉर्मरवर ताण येतो आणि तेथील यंत्रणा नादुरुस्त होऊ नये; यासाठी वीजपुरवठा आपोआप खंडित होतो.परंतु असा प्रकार दिवसभरात केव्हाही आणि सातत्याने होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
जेव्हा-केव्हा बत्ती गुल झाल्यास महावितणरच्या कर्मचारी,अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते केवळ ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड असल्याचे उत्तर देतात. सध्या लग्नसराईच्या खरेदीचा हंगाम सुरू आहे.मात्र दिवसातून अनेकवळा व रात्री सतत विजेचा लंपडाव सुरू असल्याने सातत्याने वीजपुरवठा खंडित होणे आणि काही वेळाने पूर्ववत होणे,अशा बंद-चालूच्या प्रकारामुळे कूलर,टीव्ही, फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणात बिघाड होऊन नादुरुस्त होण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे वीज वापरासाठी भरमसाट देयके वसूल करणारे महावितरण विभाग अशा नुकसानीची भरपाई मात्र देत नाही.
दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.त्यामुळे रखरखत्या उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने आजारी व्यक्ती,लहानमुले,वयोवृद्ध नागरिक यांची मोठी होरपळ होत आहे.सध्या उष्णतेमुळे गलितगात्र होण्याची वेळ आली असताना महावितरण विजेचा लपंडाव खेळून जणूकाही नागरिकांना वेठीस धरू लागले असल्याची हल्ली प्रचिती निदर्शनास येऊ लागली आहे.त्यामुळे कुठेतरी यावर आळा घालण्यात यावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

