उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. कामावर जाणाऱ्या मजुरांची मजुरी व कामावर देखरेख करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचा केलेला मेहनताना थकल्याने उपासमारीची वेळ आली आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता थकलेली मजुरी व ग्रामरोजगार सेवकांचा मेहनताना त्वरित देण्यात यावा; अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा गडचिरोली जिल्हा ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने गडचिरोली उपमुख्यकार्यकारी अधिकारी (रोहयो) यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या रोजगार हमीच्या कामावर जाणारे गोर-गरीब नागरिक असुन अनेकांची स्थिती हातावर आणून पानावर खाण्याजोगी आहे.अनेक मजुर अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर असुन येणाऱ्या मिळकतीवर शेतीचे नियोजन तसेच घरची आर्थिक स्थिती सांभाळत असतात.सद्यास्थितीत शेतीचा हंगाम जोमात असुन या करीता खते,रोवणी,निंदण, किटकनाशके घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असते.अशातच केलेल्या रोजगार हमीची मजुरी थकल्याने नियोजन करायचे कुठुन?याच विवंचनेत शेतकरी,शेतमजूर सापडले असुन मजुरी थकल्याने शेतकामे तसेच आर्थिक देवाणघेवाणीची मोठी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता थकलेली मजुरी तसेच ग्रामरोजगार सेवकांना मिळणारा मेहनताना यथाशिघ्र देण्यात यावा; अन्यथा जिल्ह्यात ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतिने कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक प्रधान,सचिव मंगेश फुकटे, ग्रामरोजगार सेवक जालधर बोदेले,अमोल लाडे, प्रकाश बावणे,संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

