- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-शहरातील जानकाबाई कोल्हे कॉन्व्हेन्टमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच वर्षीय मुलाला आणण्यासाठी सायकलने जात असतांना वाटेतच मालवाहू ट्रकने सायकलला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल,बुधवारी १८ डिसेंबरच्या दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरमोरी शहरातील छत्रपती चौक वळणावर पोस्ट कार्यालयासमोर घडली.किरण संजय गोंदोळे रा.बर्डी परिसर,आरमोरी असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,मालवाहू ट्रक क्रमांक-एमएच ३४ एव्ही १२९६ हा देसाईगंजहून गडचिरोलीकडे जात होता तर किरण गोंदोळे ह्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी सायकलने जात असतांना वाटेतच मालवाहू ट्रकने सायकलला जोरदार धडक दिली. जोरदार धडक बसताच सायकल ट्रकच्या आतमध्ये गेली तर किरण यांच्या शरीरावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटना घडताच घटनास्थळी बघ्यांचा मोठा जमाव झाल्याने शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती आरमोरी पोलीस प्रशासनास कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुगणालयात पाठविला.ट्रक चालक मनिषकुमार विरबहादुरसिंग रा.कोलवारा,बिहार यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.
- Advertisement -

