उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक,शाखा देसाईगंज(वडसा) द्वारे अनिकेत महाविद्यालय, देसाईगंज येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करुन शालेय परिसर व मोकळ्या जागी शाखाधिकारी सुशिल धोपेकर आणि अनिकेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल थूल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थी हा देशाचा प्रमुख आधारस्तंभ आहे.त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण व त्या वृक्षाचे जतन करणे अत्यंत महत्वाचे आहे. ही वृक्षे भावी पिढ्यांसाठी एकप्रकारची गुंतवणूक आहे,ज्यामुळे नैसर्गिक सावली मिळेल,जमिनीची धूप, प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरण संतुलन राखून हिरवे आच्छादन वाढवेल; असे मत विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक,देसाईगंज शाखेचे शाखाधिकारी सुशिल धोपेकर यांनी व्यक्त केले.तर दिवसेंदिवस पर्यावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे.पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची गरज आहे; असे मत अनिकेत महाविद्यालय वडसाचे प्राचार्य डॉ.अनिल थूल यांनी व्यक्त केले.
वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेचे कर्मचारी आशिष नागदेवते,शुभम शेबे,गजानन देशमुख तसेच अनिकेत महाविद्यालयाचे प्राध्यापक बाळबुद्धे,नागोसे व इतर कर्मचारी आणि विद्यार्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कर्यक्रम पार पडला.

