उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याचा पॉश एरिया म्हणून गणल्या जाणाऱ्या देसाईगंज तालुक्याच्या कुरुड-कोंढाळा येथे अवैध दारू विक्रीचा महापूर सुरू असून पहाटे व दिवसाढवळ्या अवैध दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. दोन्ही गावे मिळून अवैध दारू विक्रीचे धंदे करणारे ४५ अधिक ४५ म्हणजे बरोबर ९० अंशाचा काटकोन तयार झाला आहे.अशातच दिवसेंदिवस अवैध दारू विक्रेत्यांची संख्या झपाट्याने वाढतच चालली जात असल्याने यावर आवर घालणार कोण? असा सवाल सगळ्यांकडून उपस्थित केला जातो आहे.
देसाईगंज तालुक्यातील नावारूपास आलेल्या कुरुड- कोंढाळा येथे सर्वच प्रकारची अवैधरीत्या दारू विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.पिण्यासाठी सर्वच प्रकारची अवैध दारू उपलब्ध होत असल्याने तळीरामांना कुठेही भटकंती करावी लागत नाही. अशातच पहाटे व दिवसाढवळ्या पोत्याचवरी अवैध दारूचा विक्रेत्यांना पुरवठा केला जात असल्याने याचे नवल वाटते आहे.दोन्ही गावात देशी-विदेशी,गावठी मोहफुलाची खुलेआम विक्री होत असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कुणाचाही वचपा नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर टांगला जात आहे.याकडे संबंधित विभागाने आता लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.देसाईगंज शहरापासून चार व आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड-कोंढाळा गावात दिवसेंदिवस दारू विक्री करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. नवनवीन दारू विक्रेत्यांची अवैध धंदे उदयास येऊ लागली आहेत.अशातच झटपट पैसा व लवकर श्रीमंतीच्या नादात कमी वयाची युवा पिढी अवैध धंद्यांकडे वळलेली दिसून येत आहे. काहीजण ‘आव भैय्या,कोणसी दारू होना’ व एका फोन वरती सहजरीत्या अवैध दारू उपलब्ध करून दिल्या जात आहे.कित्येकजण पैसा नसल्यास घरातील शेतमाल दारू विक्रेत्यांना विकून दारू पिण्यासाठी वापर करीत असल्याने अनेकांची संसारे उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निदर्शनास येऊ लागले आहे.
तालुक्यात हल्ली नव्याने उदयास आलेले व काही पूर्वीपासून धंद्यात माहीर झालेले दारू विक्रेत्यांना अवैध दारूचा पुरवठा करून बक्कळ पैसा कमावीत आहेत.कुरुड-कोंढाळा गावासहित तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री फोफावली आहे.मात्र संबंधित विभाग एवढी चुप्पी साधण्या मागचे कारण काय? हेच अनेकांना कळेनासे झाले आहे.देसाईगंज तालुक्याच्या कित्तेक गावांमध्ये दारू मिळत नाही काय? म्हणण्यापेक्षा कोणता ब्रँड पाहिजे; असे हल्ली चित्र निर्माण झाले असल्याने यावर संबंधित विभागाने कानाडोळा न करता; यावर त्वरित आळा घालणे आवश्यक आहे.अन्यथा अवैध दारू विक्रीचे साम्राज्य निर्माण होऊन अनेकांच्या उरावर अवैध दारू विक्रेते नाचणार; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.यासाठी तयार झालेला काटकोन वजा-बाकी होणे आवश्यक आहे.वजा-बाकी न झाल्यास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक,नीलोत्पल यांना पत्ररुपी कळवून आपबिती सांगितली जाणार असल्याची खमंग चर्चा देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

