उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की,सूर्य आग ओकू लागतो.मार्च महिन्याच्या सरुवातीपासूनच कडाक्याचे ऊन शेकु लागते.अशातच गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ गणल्या जाणाऱ्या देसाईगंज शहरात बाहेर जिल्ह्यातून तसेच इतर ठिकणांहून मोठ्या संख्येने कामगार, प्रवाशी व सर्वसामान्य नागरिक उन्हा-तान्हात खरेदी करण्यासाठी वा विविध कामे करण्यासाठी येत असतात.उन्हामुळे घामाच्या थारा शरीरातून वाहू लागून,अनेकांचा जीव कासावीस होऊन,गळा सुकल्यासारखा होतो.त्यासाठी अनेकांना शीतल थंड पेयजल मिळावे व मनाची तृप्ती व्हावी; यासाठी इकडे- तिकडे पिण्याच्या पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत असते.अशी शोधाशोध वा भटकंती होऊ नये; याकरीता देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील मार्स बॅनर प्रिंटिंग नजीक देसाईगंज शहरातील शेतकरी नेते रामदास मसराम यांनी उन्हाळ्याची चाहूल लागताच उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांसाठी मोफत पाणपोई उभारून अनेकांची रणरणत्या उन्हात तृष्णातृप्ती केली आहे.
पूर्वी जिकडे पाहावे तिकडे नागरिकांची तहान भागविण्यासाठी उन्हाळा लागला की अनेक संस्था आणि मंडळे मोफत पाणपोईचा सेवाभावी उपक्रम सुरु करायचे; मात्र सध्याच्या काळात मोफत पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.अशातच मसराम यांनी मोफत पाणपोई सुरू केली आहे.थंड पाण्याच्या दररोज १५ कॅन लागत आहेत.सदर खर्च मसराम हे स्वतः करीत आहेत.उन्हाची तीव्रता वाढली असून आता शरिराला नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासू लागली आहे.कामानिमित्त रणरणत्या उन्हात बाहेर पडलेल्या तहानलेल्या जीवांना पाणपोईचा गारवा मिळतो आहे.पादचाऱ्यांसह,कामगार,कष्टकरी, फेरीवाले,प्रवासी,विद्यार्थी अशा साऱ्यांनाच तहान भागविण्यासाठी मोफत पाणपोईचा आधार मिळाला असल्याने मसराम यांची अनेकांसाठी असलेली तळमळ दिसून येत आहे.

