- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने गळफास घेण्यापूर्वी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहून संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती उघड केली आहे.धनंजय अभिमान नागरगोजे वय ३८ वर्षे,रा.केळगाव, ता.केज,जि.बीड असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.धनंजय यांनी फेसबुकवर लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
त्यांनी आपल्या ३ वर्षीय मुलीला उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये आत्महत्येचे कारण नमूद केले आहे.धनंजय हे मागील १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते.१८ वर्षांपासून काम करीत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.आत्महत्येपूर्वी शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी म्हटले की,श्रावणी बाळा,शक्य झालं तर एकदा माफ कर तुझ्या बापूला. कारण मी तुला एकट्याला सोडून जातोय.तुला अजून काही कळत नाही,तीन वर्षे वय आहे तुझं… तुला काय कळणार,ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कधी बापू कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही.सर्वांशी चांगला वागला.पण नालायक राक्षस लोकांनी अंधारातून खूप छळ लावलाय.मला हे लोक हालहाल करून मारणार आहेत असं म्हणत शिक्षकाने सहा जणांची नावेही फेसबुक पोस्टमध्ये लिहिली आहेत.विक्रम बाबुराव मुंडे,विजय विक्रम मुंडे,अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे,गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे ही नावे शिक्षकाने लिहिली आहेत.शिक्षकाने पुढे लिहिले की,मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की,मी तुमच्या शाळेवर गेली १८ वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही,आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली.श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे.तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो.काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही.बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही.पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही असेही शिक्षकाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे आणि जीवनयात्रा संपवली.
- Advertisement -