- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
बीड:-राज्याच्या विविध भागात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे.अश्याच प्रकारे बीड जिल्हा पोलीस दलाच्या १७४ जागांसाठी आज,बुधवार ११ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.दीपक भास्कर वावळ वय २६ वर्षे,रा.ता.परळी,जि.बीड असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
सध्या बीडमध्ये पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे.आज बुधवारी पहाटे ५ वाजेपासून जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेची धामधूम सुरू होती.दीपकने दुपारी साडेबाराच्या सुमारास १६०० मीटर धावण्याची शारीरिक चाचणी पूर्ण केली.मात्र,धाव पूर्ण होताच त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला.मैदानावर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच वैद्यकीय पथकाने तातडीने दीपकला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र,रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली.रुग्णालयात पोहचताच तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मृत दीपक वावळ हा परळी तालुक्यातील रहिवासी होता.पोलिस भरतीसाठी तो बीडमध्ये आला होता.दीपक गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होता.आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी आणि देशसेवेसाठी त्याने हे ध्येय समोर ठेवले होते.मैदानावर तो आत्मविश्वासाने उतरला होता,मात्र धाव संपल्यानंतर त्याच्या आयुष्याची शर्यतच संपल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
- Advertisement -

