उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली):- ऐन उन्हाळ्याच्या दिवसात देसाईगंज तालुक्यात दररोज कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्री-बेरात्री विजेचा लपंडाव सुरू आहे.अशातच उकाड्याने नागरिकांचे बेहाल होत असूनही देसाईगंज विद्युत पुरवठा विभाग एवढे गाढ झोपेत कसे?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.
देसाईगंज तालुक्यात हल्ली वीज जाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून जणूकाही वीज समस्येची फॅशनच झाली असल्याचे दिसून येत आहे.जसे ‘फॅशन शो’ च्या वेळेस रॅम्प वॉक केले जाते; तशाच प्रकारचे वीज जाण्याचे ‘रॅम्प वॉक’ सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे.वादळ वारा काही वेळासाठी तर विजेचा लपंडाव कितीही काळासाठी असल्याने देसाईगंज विद्युत पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार दिसून येतोय.
वीज असो वा नसो विद्युत बिल सारखेच; अशातही विद्युत बिल भरणा करण्यास महावितरण कंपनी कडून तगादा लावला जातो.मात्र विजेच्या लपंडावाने नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे; त्याची भरपाई देणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहेत.विजेवर चालणारे पंखे,कुलर व इतर साहित्यही उकाड्यामुळे काम करीत नाही.अशातच वीजेची समस्येने आणखी त्यात भर पाडून नागरिकांचे घामामुळे ‘टीप-टीप बरसा पाणी’असे होत आहे.काही सुजाण नागरिकांच्या मते,जाणून बुजून वीज वाचविण्याकरिता विजेचा लपंडाव तर सुरू नसावा ना..!अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.काही काळ जरी वीज बंद ठेवली गेली तरी भरपूर व मोठ्या प्रमाणावर वीजेची बचत होऊन विद्युत वितरण कंपनीस त्याचा लाभ होत असतो.लाभासाठी हल्ली कुणी कुठलेही पाऊल उचलू शकतात; असे म्हणणे चुकीचे ठरुच शकणार नाही.
दररोज दिवसाढवळ्या,रात्री-बेरात्री जाणाऱ्या विजेमुळे नागरिकांचे बेहाल होत असल्याने ‘ये ना चॉलबे’ यासाठी देसाईगंज विद्युत पुरवठा विभागाने याकडे कानाडोळा न करता विजेच्या समस्येवर उपाययोजना करून त्यावर त्वरित तोडगा काढण्यात यावा;अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.