उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यात तेंदुपत्ता संकलनाला सुरुवात झाली आहे.मात्र,मागील गेल्या वर्षांमध्ये तालुक्यातील कोंढाळा,उसेगांव, शिवराजपुर,कासवी,एकलपुर व इतर जंगल परिसरात मानव-वन्यप्राणी संघर्ष होऊन वाघाच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला.जंगलव्याप्त परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. तालुक्यातील नागरिकांना वाघाच्या दहशतीत आजही जीवन जगावे लागत आहे.परिणामी गावातील नागरिक तेंदुपत्ता संकलन तर करीत आहेत; मात्र तेंदुपत्ता संकलन करतांना मनात भीती बाळगून वाघ,वाघीण वा इतर हिंस्त्र प्राणी हल्ला तर चाढविनार नाही ना..! अशी नागरिकांची मनधारणा झाली असल्याने पाहिजे त्या प्रमाणात तेंदुपत्ता संकलणातून रोजगार मिळेनासा झाला आहे.
देसाईगंज तालुक्यातील अनेक गावे जंगल परिसराला लागून आहेत.त्यामुळे या गावा लगतच घनदाट जंगल असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांचा वावर आहे.दरम्यान,गेल्या वर्षांमध्ये मानव-वन्यप्राणी संघर्ष होऊन वाघाच्या हल्ल्यात अनेक शेतकरी, गुराखी,महिलांचा बळी गेला.घरातील कर्ता कुटुंब प्रमुख गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे.त्यामुळे नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत.
देसाईगंज तालुक्यात धानपीक झाल्यावर रोजगाराचे कुठलेही साधन नाही.त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिक तेंदुपत्ता संकलनाच्या रोजगारावर अवलंबून असतात.यातून मिळणाऱ्या मिळकतीने कुटुंबाची घडी बसण्यास मोठा हातभार लागतो.तर,शेतीच्या हंगामासाठी लागणाऱ्या खर्चाला,गरीब कुटुंबातील मुलामुलींच्या लग्नालाही मदत होते.
त्यामुळे नागरिक तेंदुपत्ता संकलनाची चातकासारखी वाट बघत असतात.मात्र, होणाऱ्या मानव- वण्यप्राणी संघर्षाच्या भीतीने नागरिक भयभीत झाले असून तेंदुपत्ता संकलन सुरू झाले असले तरी नागरिकांना जेमतेम बोटावर मोजण्याइतकेच दिवस तेंदुपत्ता संकलनास मिळत असतात.त्यामुळे मानव- वण्यप्राणी संघर्ष होऊ नये; याकरिता वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

