- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार २९ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.महिलेच्या निघृण हत्येप्रकरणाचा राजुरा पोलिसांनी उलगडा करत आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली आहे.राजेश व्यंकय्या अटेल्ला वय ३५ वर्षे,रा.रापनपल्ली, जि.मंचेरियल,तेलंगणा असे हत्या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.तर शीतल रणधीर कुंभारे वय ३६ वर्षे,रा.महाकाली कॉलनी,कपिल चौक,चंद्रपूर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
शीतल कुंभारे या आपल्या लहान मुलीसह राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहत येथे आई व भाऊ राहत असल्याने माहेरी आली होती. गुरुवार २८ मे रोजी रात्री त्यांची आई व भाऊ देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते.घरात शीतल व तिची मुलगी दोघीच होत्या.मुलगी दुसऱ्या खोलीत झोपलेली असतांना अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून शीतल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.गळा चिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.सदरची घटना २९ मे रोजी सकाळी उघडकीस होती.घटनेची माहित मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मृत महिलेचे पती रणधीर राजू कुंभारे यांना त्यांच्या सासूच्या शेजाऱ्यांनी फोनवरून माहिती दिली की,त्यांची पत्नी शितल कुंभारे हिने रक्ताच्या उलट्या केल्या असून तिची काहीही हालचाल होत नाहीये.रणधीर कुंभारे यांनी तात्काळ मोपेड वाहनाने धोपटाळा येथील सासूचे घर गाठले.तेव्हा घरात जे दृश्य दिसले त्याने सर्वांचाच थरकाप उडाला.घराच्या पाठीमागील देव्हाऱ्याच्या खोलीत शितल कुंभारे या खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या.कोणातरी अज्ञाताने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले होते.या प्रकरणी रणधीर कुंभारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक-५१६/२०२६,भारतीय न्याय संहिता कलम १०३(१),३३२ (अ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेनंतर राजुरा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे,गोपनीय माहिती आणि विविध धागेदोरे तपासत आरोपीचा माग काढला. मृतक शितल कुंभारे हिच्या मोबाईलवर राजेश व्यंकय्या अटेल्ला याचे संभाषण झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड होताच पोलिसांनी अटेल्ला याच्या मागावर पथक पाठवून तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यातून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपी राजेशने आपला गुन्हा कबूल केला असून हत्येमागचे कारण सांगितले.मृतक शितल आणि आरोपी राजेश हे एकाच गावातील असून त्यांचे बालपणापासून प्रेमप्रकरण होते.मात्र,काही दिवसांपूर्वी शितलने राजेशला व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले होते.तसेच ती दुसऱ्या तरुणांसोबत बोलते असा संशय राजेशला होता.याच रागातून आणि संशयातून त्याने थेट तेलंगणातून येत शितल हिची झोपेतच गळा चिरून निघृण हत्या केली.क्षुल्लकशा कारणावरून एका विवाहित महिलेने आपला जीव गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे,राजुराचे ठाणेदार आसिफ रजा शेख,पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकार,सर्वेश बेलसरे,सुभाष गोहोकार,किशोर वैरागडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक ठाकरे,पोलिस उपनिरीक्षक किशोर तुमराम,तसेच विक्की निर्वाण, शफिक शेख,मिलिंद जांभुळे आणि महेश बोडगोलवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
- Advertisement -

