- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-महायुतीच्या मंत्रीमंडळाचा काल,रविवारी १५ डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडला.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह ३३ कॅबिनेट मंत्री तर ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.यात भाजपच्या सर्वाधिक १९ जणांचा समावेश आहे.तर शिवसेनेच्या ११,तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांचा समावेश आहे.गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू देत यंदा महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मिळून २५ नवे चेहरे दिले आहेत.अशातच सलग ३० वर्षे आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले नसल्याने चंद्रपूर जिल्हा मंत्री पदाला पोरका झाल्याचा संताप जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे.
राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकासाचा झंझावात निर्माण केला.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतरचे पहिले ‘सरप्लस’ बजेट महाराष्ट्राला दिले.या शिवाय ५० कोटी वृक्षारोपण करीत त्यांनी गिनीज बुक ऑफ वल रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले.अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेतली होती.
महायुती सरकारच्या दुसऱ्या पर्वामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा आवर्जून समावेश असेल, असे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही वाटत होते.त्यामुळे सलग सात वेळा विधानसभा जिंकणारे सुधीर मुनगंटीवार यांना काय मिळणार? याची उत्सुकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होती. मात्र सुधीर मुनगंटीवार यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत न आल्यामुळे बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला.चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना ८६ हजारांवर मते मिळाली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी ३३ हजार ४४० मतांनी विजय मिळवला होता.यंदाच्या निवडणुकीत त्यांना मिळालेली आघाडी मोठी आहे.२५ हजार ९८५ मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या आघाडीमध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे भाजपमधील त्यांची ज्येष्ठता आणि जनसंपर्क पाहता त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद मिळणे गरजेचे होते.मात्र,असे न झाल्याने चंद्रपूर जिल्हातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक कमालीचे नाराज झाले आहेत.
- Advertisement -

