- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एखाद्या निर्जनस्थळी असतांना वाघाचे दर्शन तर सोडाच,नुसते नाव ऐकले तरीही अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.त्यातच एखादा वाघ अंगावर धावून आला तर अश्याची अवस्था काय होणार?अश्याच प्रकारे शनिवारी दुपारच्या सुमारास शेतावर गेलेल्या शेतकऱ्यास वाघाचे दर्शन तर झालेच,पण अचानकपणे वाघाने झडप घालून शेतकऱ्याच्या डोक्यावर,खांद्यावर व पायांवर गंभीर जखमा केल्याची घटना साकोली तालुक्यातील किन्ही(एकोडी) गावाजवळील शेतीशिवारात घडली.विशेष म्हणजे,परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरड करून घटनास्थळी धाव घेतल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली.अन्यथा ऐन सणासुदीच्या काळात मोठी दुर्घटना घडली असती.घटनेत किन्ही(एकोडी) गावातील ४५ वर्षीय ब्रिजलाल हरिनखेडे गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर सध्या साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.काल शनिवारी ब्रिजलाल हे आपल्या शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते.पीक पाहणी करून परत जात असतांना सोमाजी बघेले यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्याने ब्रिजलाल वाघाशी झटापट केली.मात्र,यात ब्रिजलाल यांच्या डोक्यावर,खांद्यावर व पायांवर गंभीर जखमा झाल्या. घटनेच्या ठिकाणी उपस्थित शेतकरी व मजुरांनी आरडाओरड करून धावपळ केली.ज्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला.लागलीच नागरिकांनी घटनेची माहिती वन विभागास देत ब्रिजलाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेने परिसरातील शेतकरी धास्तावले असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी गावकरी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
- Advertisement -

