- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शेतात राबराब-राबून मक्याचे पीक घेतले.पण, अचानकपणे शेतात आग लागल्याने ती विझवत असतांनाच एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा आगीच्या कचाट्यात सापडल्याने होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरालगतच्या शेतशिवार परिसरात घडली.रामदास गोखलू निंबेकर वय ६५ वर्षे, रा.तलाव वॉर्ड,साकोली,जि.भंडारा असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून सदरची आग ही वणव्यामुळे लागली की अन्य कारणामुळे,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सध्या तीव्र उन्हाचे दिवस असल्याने जंगल परिसरात तसेच इतर ठिकाणी अचानकपणे आग लागण्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.अश्याच प्रकारे शेतकरी रामदास निंबेकर हे शेतावर असतांनाच आगीने रौद्ररूप धारण केले.आगीमुळे शेतातील मका पीक नष्ट होणार यासाठी त्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र,संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने रामदास हे सुध्दा त्यात अडकले आणि मृत पावले.दरम्यान,परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी धावपळ केली.मात्र आगीच्या भडक्यात सापडलेल्या शेतकऱ्याला वाचविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी साकोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

