- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. कारवाईत जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ९९ लाख ७८ हजार रुपये इतकी असून अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ३५ लाख रुपये किंमतीचा टाटा ट्रक, असा एकूण १ कोटी ३४ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.प्रकरणी ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पंकजकुमार भूषण यादव वय ३० वर्षे,रा.छपरा, बिहार आणि बापी बादल मलिक वय ३८ वर्षे, रा.नवाग्राम,पश्चिम बंगाल अशी आरोपींची नावे असून दोन्ही आरोपींविरोधात साकोली पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक-६०६/२०२६ अन्वये कलम ८(क), २०(ब)(ii)(क)एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकोली पोलिसांना आज,सोमवार २७ जुलैच्या पहाटे ओडिशा राज्यातून गांजाने भरलेला टाटा कंपनीचा डब्लूबी २३ एफ ८७८५ क्रमांकाचा ट्रक रायपूर-राजनांदगाव-देवरी-साकोली या राष्ट्रीय महामार्गे नागपूरकडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे,वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा टोलनाक्यावर पहाटे सापळा रचण्यात आला.पहाटे सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान संशयित ट्रक अडवून त्याची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली.तपासणी दरम्यान ट्रकमध्ये लपवून ठेवलेला १९९.५६० किलो गांजा आढळून आला.जप्त केलेल्या गांजाची किंमत ९९ लाख ७८ हजार इतकी असून ट्रकची किंमत ३५ लाख अशा प्रकारे एकूण १ कोटी ३४ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विशेष म्हणजे,यापूर्वीही साकोली पोलिसांनी मुंबई नार्कोटिक्स विभागाच्या सहकार्याने सेंदूरवाफा टोलनाक्यावर मोठी कारवाई करून तब्बल २४५ किलो गांजा जप्त केला होता. त्याहीवेळेस ओडिशाहून नागपूरकडे निघालेल्या आयशर ट्रकमधील कॅरेटच्या खाली ठेवलेला अंमली पदार्थ पोलिसांनी शोधून काढला होता.त्याही प्रकरणात चालक व क्लीनरला ताब्यात घेण्यात आले होते.आज करण्यात आलेली कारवाई भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे आणि साकोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस ठाण्याचे एपीआय जितेंद्र राऊत,पीएसआय किशोर मानकर, अर्जुन बेडवाल,स्वप्नील गोस्वामी,नरेंद्र झलके,सचिन राऊत, टेकचंद बुरडे,गोविंद शिंदे,धनविजय गणवीर यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

