- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली,असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज,बुधवार १० जून रोजी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात माध्यमांशी संवाद साधतांना काढले.देशाचे निर्वाचित प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवा देण्याचा ४ हजार ३९९ दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन केले आहे.
प्रधानमंत्री मोदी यांच्या कारकिर्दीचे ४ हजार ३९९ दिवस हे केवळ कालगणनेतील आकडे नसून हा कालावधी भारताच्या सर्वांगीण विकासाचे एक महत्त्वपूर्ण पर्व असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,या कालावधीत देशातील कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य झाले.देशात रस्ते,रेल्वे,बंदरे, विमानतळ,द्रुतगती महामार्ग आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व जाळे उभारण्यात आले.भारताने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेत जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्थांमध्ये स्थान निर्माण केले आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन प्रकल्पांना चालना देण्यात आली,जलसंधारण आणि कृषी विकासासाठी विक्रमी गुंतवणूक करण्यात आली. ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे चित्र आज देशभर दिसून येते. संरक्षण क्षेत्रात भारताने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत जगासमोर आपली क्षमता सिद्ध केली आहे. एकेकाळी शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणात आयात करणारा भारत आज हजारो कोटी रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश ठरला आहे.यूपीआय आणि डिजिटल पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून भारताने जगासमोर डिजिटल क्रांतीचा आदर्श निर्माण केला आहे. ‘विकास भी और विरासत भी’ या ध्येय वाक्याला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान मोदी यांनी विकास आणि सांस्कृतिक वारसा यांचा समतोल साधण्याचे कार्य केले आहे.त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे,असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
महाराष्ट्राला गेल्या बारा वर्षांत प्रधानमंत्री मोदी यांचे भरीव सहकार्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले,राज्यातील अनेक महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प,वाढवण बंदर,महामार्गांचे विस्तृत जाळे, मेट्रो प्रकल्प,रेल्वे आधुनिकीकरण,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे.पूर्वी केवळ कागदावर असणारे प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होतांना दिसत आहेत.यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पाणीटंचाईचा प्रश्न सोडवतांना दाखवलेली संवेदनशीलता खरोखरच कौतुकास्पद आहे.२०१५ च्या भीषण दुष्काळात त्यांनी विशेष लक्ष देऊन ‘जलयुक्त शिवार’ सारख्या योजनांना बळ दिले आणि विदर्भ व मराठवाड्यातील शंभर प्रलंबित धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला.अशा प्रकारे आपल्या राज्याच्या समस्यांवर इतक्या संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करणारा नेता मिळणे,हे महाराष्ट्राचे भाग्यच म्हणावे लागेल,अशी भावना व्यक्त करतांना महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मी आपल्या लाडक्या आणि लोकप्रिय पंतप्रधानांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो तसेच त्यांच्या निरोगी,दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो,अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे अभिनंदन केले.
राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे.यामध्ये यापूर्वी कर्ज घेतलेले आणि सध्या थकीत असलेले सर्व शेतकरी समाविष्ट असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले,केवळ २०२० मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या आणि पुन्हा थकीत झालेल्या काही शेतकऱ्यांबाबत काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.अशा शेतकऱ्यांची संख्या सुमारे ९ ते १० लाखांच्या आसपास आहे.त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.मात्र,वारंवार दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीमुळे बँकिंग व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.२०१७ मध्ये कर्जमाफी मिळाली, २०२० मध्ये पुन्हा मिळाली आणि त्यानंतर २०२६ मध्येही कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी दिली गेली,तर बँकिंग व्यवस्था कोलमडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि बँकिंग व्यवस्थाही सक्षम राहावी,या दोन्ही बाबींचा विचार करून काही मर्यादित अटी घालण्यात आल्या आहेत.मात्र या अटींमुळे ९९ टक्के शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जावी ही आमची स्पष्ट भूमिका आहे. कर्ज कोणत्या वर्षी घेतले याचा विचार न करता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी पूर्णपणे दिली जाणार आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात खतांसंदर्भात काही निर्बंध ठेवण्यात आले आहेत. कारण आपण बहुतांश खते आयात करतो.त्यामुळे अमर्याद प्रमाणात खतांची उपलब्धता करून देणे शक्य नाही,असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले,सध्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पुरेशी खते उपलब्ध आहेत.मात्र,कोणी खतांचा अनावश्यक साठा करून ठेवला तर कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते.हे टाळण्यासाठी काही निकष,तसेच अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत,जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक तेवढे खत उपलब्ध होईल. विशेषतः मिश्र खतांच्या बाबतीत सध्या गरजेनुसार पुरेसा साठा उपलब्ध आहे.एखाद्या शेतकऱ्याला विशिष्ट प्रकारचे खतच हवे असल्यास काही प्रमाणात अडचण जाणवू शकते; मात्र एकूणच खतांचा पुरेसा साठा करण्यात आलेला असून शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही,अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
- Advertisement -

