उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा व इतर गावांतील जंगल परिसरा लगत काटेरी कुंपणाचे तार (barbed wire fencing) तसेच सिमेंट-काँक्रिटच्या खांबाचे काम देसाईगंज वन परिक्षेत्र कार्यालयातर्फे निकृष्ट दर्जाचे केल्या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक यांना तक्रारीद्वारे दिनांक- ३१ मे २०२४ रोजी मागणी करण्यात आली आहे.
मौजा- कोंढाळा गावापासून काही अंतरावरील जंगल परिसरा लगत जंगलातील वन्य प्राण्यांच्या अटकावसाठी काटेरी कुंपणाचे तार (barbed wire fencing) तसेच सिमेंट-काँक्रिटच्या खांबाचे लाखो रुपयांचे काम सन-२०२३-२४ या वित्तीय वर्षामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय देसाईगंज (वडसा)तर्फे करण्यात आले आहे.मात्र,सदर करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे.काही ठिकाणी सिमेंट-काँक्रिटचे खांब अजूनही वाकलेले,तुटून पडलेले तसेच काहींना भेगा पडलेल्या अवस्थेत आहेत.गाळण्यात आलेल्या खांबांना काही ठिकाणी खड्डे खोदकाम न करताच वरवर काँक्रिट लावल्याने अनेक खांब(पोल) गळून पडलेले आहेत.काही ठिकाणी जुनेच तार लावून कलाकारी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.लाखो रुपयाच्या कामाचा काही कालावधीतच बट्ट्याबोळ होणे ही अत्यंत लाजिरवाणी तसेच तितकीच गंभीर स्वरूपाची बाब आहे.त्यामुळे फिफ्टी-फिफ्टी(५०-५०) चा फंडा तर नसावा ना..? अशा चर्चांना उधाण येऊ लागले आहे.
अशातच मानव व वन्यजीव संघर्ष टाळता यावा; यासाठी सिमेंट-काँक्रिटच्या खांबाला काटेरी कुंपणाचे तार लावण्यात आले असल्याने एखादे वेळी वन्यजीव प्राण्यांना धोका असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.हिंस्त्र प्राणी वा इतर प्राणी काटेरी तारांच्या कुंपणास एखादेवेळेस धडकल्यास मृत्युमुखी पडू शकतात.तसेच गंभीररीत्या जखमी होण्याची संभावना आहे.त्यामुळे काटेरी कुंपणाचे तार लावण्या ऐवजी साखळी तारेचे कुंपण(Chain link fencing) कां लावण्यात आले नाही? महत्वाचे म्हणजे,याच विभागातर्फे रोपवन वा इतर काही ठिकाणी साखळी तारेचे कुंपण(Chain link fencing) करण्यात आले आहे.मात्र,वन्य प्राण्यांच्या अटकाव बाबतीत असे कां? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे. एकीकडे शासन वन्य प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावपणे करीत आहे.मानवी जीवनापेक्षा वन्य जीवांचे संरक्षण गरजेचे असल्याचे हल्ली दिसून येत आहे.मात्र,वन परिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयातर्फे याठिकाणी वेगळाच प्रकार घडून आलेला आहे.निकृष्ट दर्जाचे काम करीत असतांना त्यावर कुणाचीही देखरेख नसणे वा सर्व प्रकार नजरे समोर असूनही न दिसल्यासारखे करणे; ही अत्यंत खेदपूर्वक बाब आहे.संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचा असून सदर प्रकारास सर्वस्वी जबाबदार वन परिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय देसाईगंजचे वन परिक्षेत्र अधिकारी,वनपाल व इतर असल्याने कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.कारवाई न झाल्यास वडसा वन विभागाच्या उपवसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

