उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर चंद्रपूर वन परिक्षेत्राच्या वतीने वन उद्यानाचे काम सुरू झाले आहे.याठिकाणी वनविभागाने मोठा खड्डा खोदला असून,त्यात बोअर खोदण्याबरोबरच जवळच्या पाईपलाईनमुळे खोल खड्डा पाण्याने भरला आहे.या खोल खड्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.ही दुदैवी घटना काल,रविवारी दिनांक -२ जून रोजी दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार दुर्गापूर मेजर गेट जवळील राममंदिरच्या मागे राहणारे तनवीर शेख रहमान (वय १५ वर्ष,दादमहल वार्ड,हनुमान खिडकी निवासी आर्यन साईनाथ यलगमवार वय १६ वर्ष,भंगाराम मंदिर भिवापूर वार्ड निवासी क्रिष्णा जितेंद्रकुमार साहू आणि सकलेन हमीद खान पठान वय २० वर्ष हे चारही जण मोटरसायकल क्र.एमएच ३४ सीसी ५४४४, एमएच १२९५ ने दुपारी १ वाजता लालपेठ कॉलरी बंकर जवळ वनविभागद्वारा खोदलेल्या खड्याजवळ पोहोचले.तनवीरने हिंमत दाखवून मोटारसायकल धुण्यासाठी पाण्याच्या खड्यात प्रवेश केला.मात्र,पाण्यात खड्ड्याची खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.दरम्यान त्याचे दोन मित्र आर्यन आणि कृष्णा यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र,तनवीर पाण्यात बुडाल्यावर सर्वजण अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपापल्या घरी पोहोचून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती तात्काळ शहर पोलिस ठाण्यात दिली.पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाची मदत घेत पाण्यात बुडालेल्या तनवीरचा मृतदेह बाहेर काढला.पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.

