उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कुरुड,कोंढाळा, विर्शि,आमगाव,सावंगी व इतर गावांतील शेतीला मागील वर्षाच्या ऑगष्ट महिन्यात कृत्रिमरीत्या आलेल्या पुराने वेढा घातला होता. पुरामुळे तालुक्यातील ११९१ शेतकऱ्यांच्या ७६४.०३ हेक्टर वरील शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.त्यानुसार गावातील तलाठ्यांनी तात्काळ पंचनामे करून एकूण- १ कोटी २९ लाख ८८ हजार ५१० रुपये एवढी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्याकडे दिनांक- ९ ऑक्टोंबर २०२३ रोजी प्रस्तावित केली आहे.मात्र पुर ओसरून दहा महिन्यांचा कालावधी व प्रस्तावित रकमेचा आठ महिन्यांचा कालावधी लोटूनही अजून पावेतो पूरबाधित शेतकऱ्यांच्या नुकसाभरपाईची रक्कम मिळाली नसल्याने; नुकसानभरपाई रक्कम आज मिळणार,उद्या मिळणार; अशा आशेवर तालुक्यातील शेतकरी बांधव असल्याने आर्थिक विवंचनेत सापडून चिंताग्रस्त झाले आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वी,मागील वर्षाच्या जुन,जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांची रक्कम मिळाली आहे.तसेच शासनाने हेक्टरी जाहीर केलेल्या धानाचे बोनस सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.मात्र कृत्रिमरीत्या आलेल्या पुराने ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकांचे नुकसान झालेत; अशांनी धान्य खरेदी केंद्रांवर धान्य विक्री केली नसल्याने बोनस मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.अशा शेतकऱ्यांनी काय करावे? एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी मोठ-मोठ्या घोषणा करतांना दिसून येतात.दिलेल्या घोषणांमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढून आतुरतेने वाट बघण्याची वेळ येत असते व शेवटी नेहमीप्रमाणे शेतकरी हताश होऊन निराशा बाळगत असतो.कितीतरी महिने लोटूनही पुरबाधित शेतकऱ्यांची रक्कम जमा होण्याचे नावच घेत नाल्याने शासन शेतकऱ्यांसाठी उदासीन असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे व केवळ बाता मारून पोकळ आश्वासने देण्यात तल्लीन होऊन आपली भूमिका बजावत आहे.

