उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :-राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा करीत महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे.सदर योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.त्यानुसार १ जुलै पासून राज्यभर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रत्यक्षात योजनेचे अर्ज भरताना महिलांना तसेच इतर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशातच देसाईगंज तालुक्याच्या काही तलाठी कार्यालयातील कर्मचारी उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी महिलांकडून तसेच इतर नागरिकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती मिळत आहे.उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी कार्यालयातील कर्मचारी प्रत्येकी ३० ते ४० रुपये घेत असा असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याने यावर त्वरित आळा घातला जावा; अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,देसाईगंज तालुक्याच्या काही तलाठी कार्यालयात कोतवाल यांची पदे रिक्त असल्याने संपूर्ण साज्याचा भार तलाठी कर्मचाऱ्यांवर पडत आहे.यासाठी बाह्य व्यक्ती रोजंदारीवर ठेवले जात आहे.रोजंदारीवर ठेवण्यात आलेल्या व्यक्तींना नागरिकांकडून आर्थिक लूट करण्यात आलेल्या रकमेतून भरपाई(रोजी) देण्याचा हल्ली प्रकार दिसून येतो आहे.असाच प्रकार सध्याच्या घडीला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत घडत आहे.सदर योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.रुपये २.५० लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे.मात्र,उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कुठलेही पैसे लागत नसतांना महिलांकडून तसेच इतर नागरिकांकडून ३० ते ४० रुपये तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून घेतले जात आहेत.शासन स्तरावरून पैसे घेण्याबाबत कुठलेही पत्र वा आदेश नसतांना होणारी आर्थिक लूट थांबविण्यात यावी; अशी मागणी केली जात आहे.
देसाईगंज तहसीलदार,प्रीती डूडूलकर 👇
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही; दाखल्यासाठी पैसे घेणे चुकीचे आहे.असे आढळून आल्यास,यावर त्वरित आळा घातला जाईल.

