उद्रेक न्युज वृत्त
सिंदेवाही(चंद्रपूर) :- सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत खातगाव येथील महिलांनी सरपंचासह सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंबल्याची घटना काल,सोमवारी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास घडली.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर आहे.खातगावात पाण्याची मारामार असल्याने महिलांचा रोष होता.त्यामुळे खातगाव ग्रामपंचायत कार्यालयाची मासिक बैठक घेण्यात आली.बैठक चालू असताना गावातील विशिष्ट गटातील महिलांनी अचानक ग्रामपंचायत कार्यालयावर जमाव करून कार्यालयाचे द्वार बंद केले. त्यामुळे कार्यालयात असलेले गावातील सरपंच मेघश्याम सिडाम,सदस्य सुरेखा नैताम,प्रेमिला चहांदे, रेखा नेवारे,तसेच चपराशी हिवराज डोंगरवार आणि संगणक चालक नागदेवते हे ग्रामपंचायत कार्यालयात आत सापडले.गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवलेल्या सदस्यांना शिवीगाळ करीत पाणीपुरवठा सुरू करा; असे ओरडून दबाव आणून कार्यालयाला कडी लावली.घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक सागर महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पोलिस वाहनाने तात्काळ खातगाव येथे पोहोचले असता काही महिलांनी परिसरातून काढता पाय घेतला.त्यानंतर पोलिसांनी महिलांची समजूत काढल्यानंतर सरपंच, सदस्य व कर्मचारी यांना कार्यालयाबाहेर काढले.

