- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून पूर्वेस अवघ्या १० किलोमिटर अंतरावर असलेल्या किन्हाळा-मोहटोला व अरततोंडी हे गांव १९९३ ला पुनर्वसित केले गेले.किन्हाळा हे गांव आदर्श गाव म्हणून पुरस्कृत आहे.या गावात सर्वच पक्षांचे राजकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात.परंतु स्वार्थी राजकीय संघर्षामुळे गाव अजूनही विकासापासून कोसो दूर आहे.गेली ३० वर्षांपासून कोणत्याच प्रतिनिधीला गावाच्या विकासात रस दिसत नाही; मग ते ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य किंवा ग्रामसेवक असो या सर्वांना कुणालाही कसलेही देणेघेणे नाही; अशी खोचक टीका परमात्मा एक सेवाभावी संस्था गडचिरोली संस्थापक तथा परमात्मा एक सेवक मार्गदर्शक यांचे प्रणेते डॉ.गोविंदराव सीताराम दोनाडकर, रा.किन्हाळा यांनी सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांच्याकडे व्यक्त केली.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे इच्छुक युवा नेता उमेदवार खेमराज नेवारे यांनी दोनाडकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी गावातील अनेक समस्या संदर्भात संवाद साधला.डॉ.गोविंदराव दोनाडकर यांनी सांगितले की,किन्हाळा-मोहटोला व परिसरातील काही भाग अजूनही विकासाची वाट पाहत आहे.गडचिरोली जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र,आदिवासी लोकांसाठी मूलभूत सोयी- सुविधा नाही.गावातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे दगड आहेत.त्यामुळे बालक, गावातील नागरिक यांनी चालावे कसे?असा सवाल उपस्थित होतो.सार्वजनिक विहीर अनेक वर्षांपासून कोरडी पडली आहे.नळ योजना केवळ नावापुरतीच उरली आहे. नियमित पाणीपुरवठा होत नाही,त्यामुळे नागरिकांना १२ महिने पाण्याची अडचण भासते. नालीचे बांधकाम न केल्यामुळे संपूर्ण पावसाळभर रस्त्यावर २ ते ३ फुटाच्या वर पाणी साचून राहते. मोकळ्या जागेत झूडुपी जंगल तयार झाले आहे; त्यामुळे नागरिकांना सरपटणारे प्राणी यांचा नेहमीच धोका कायम राहतो; अशा अनेक अडचणी आहेत.
तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या भागात सिमेंटचे रस्ते तयार करणे,नालीचे बांधकाम करणे, पाण्याची सुविधा उपलब्ध करणे,तसेच मोकळ्या जागेची साफसफाई करणे या प्रश्नांना प्राथमिकता देऊन शासनाने लवकरात-लवकर उपाययोजना करावी अन्यथा येत्या काही दिवसांत युवा नेता खेमराज नेवारे व परमात्मा एक मार्गदर्शक डॉ.दोनाडकर यांच्या पाठिंब्याने किन्हाळा-मोहटोला व अरततोंडी येथील नागरिकांसह गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले.प्रसंगी नरेश वासनिक सह ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisement -

